भंडाऱ्यात पार पडली गोधनपूजा, गुराख्याच्या अंगावरून चालला १५० गायीचा कळप

भंडारा : ७ नोव्हेंबर – बलिप्रतिपदेच्या दिवशी विविध पध्दतीने गोधनाची पूजा सर्वत्र केली जाते. परंतु जमिनीवर पालथे झोपुन अंगावरून संपुर्ण गोधन चालवून घेण्याची अनोखी परंपरा मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील शेतकर्यांनी १५0 वर्षांपासून अखंत सुरू ठेवली आहे. दुपारी १२ वाजतापासून २ वाजतापयर्ंत चाललेल्या या चित्तथरारक गोधन पूजेत जांभोरा येथील गुराखी विनायक सुरेश परतेकी (३४ वर्ष) यांच्या अंगावरून १५0 गायींचा कळप चालून गेल्यानंतरही ते सुखरूप आहेत. गोमातेमुळेच आपण सर्व जिवंत आहोत, तीचे ऋण फेडण्यासाठी आम्ही तिच्या चरणाखाली स्वत:ला वाहून घेतो. यात काहीच वावगे नाही. हा अंधर्शद्धेचाही प्रकार नाही. आमच्या पणजोबांपासून ही प्रथा सुरू आहे, असे ते हसतमुखाने सांगतात.
मोहाडीपासून ३५ किमी अंतरावर जंगल, पहाडाच्या कुशीत जांभोरा हे ४ हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात सर्व जाती धमार्चे लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावात १00 टक्के शेतकरी असून त्या सर्वाकडे मिळून १५0 ते २00 गायी आहेत. शेती करणे हा मुख्य व्यवसाय या गावात आहे. गावातील सर्व गायी चराईसाठी नेण्याचे काम पिढ्यानपिढ्या परतेकी कुटुंबाकडे आहे. १५0 वर्षापूर्वी गोधन अंगावरून चालवण्याची प्रथा परतेकी कुटुंबाने सुरू केली. गावातील सर्व गायींना आंघोळ घातली जाते. शिंग रंगवून व नवीन गेटे, दावे बांधून त्यांना सजविले जाते. तांदळाची खीर गायींना खाऊ घातल्यानंतर संपूर्ण गोधनाची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक मुख्य चौकात आल्यानंतर गुराखी जमिनीवर पालथा झोपतो आणि संपूर्ण गोधन त्याच्या अंगावरून जाते. तरी देखील गुराख्याला कुठलीही इजा होत नाही. हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील गावातील लोक जांभोरा येथे हजेरी लावतात.

Leave a Reply