ऐन दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले – सामनामधून टीका

मुंबई : ४ नोव्हेंबर – नुकत्याच देशभरामध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निकालांवरुन शिवसेनेने भाजपाला फटकारले असून हा निकाल ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. जनता आता त्यांच्याशी निगडीत प्रश्नांवर मतदान करु लागली असल्याचं म्हणतानाच मोदींच्या जीवावर शिवसेनेचे १८ खासदार निवडणून आल्याचा दावा करणाऱ्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना या निवडणुकीमधून उत्तर मिळाल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे. दादरा-नगर हवेलीमधील डेलकर यांचा विजय बरंच काही सुचित करणारा असल्याचं म्हणत आता दिल्लीचा दरवाजाही ठोठावणार असा हुंकार शिवसेनेनं भरला आहे.
“ऐन दिवाळीत भारतीय जनता पक्षाचे कंदील विझले आहेत. हा शुभशकुन नाही. आपणच अजिंक्य आणि अजेय आहोत या त्यांच्या अहंकारासही पोटनिवडणुकांच्या निकालांनी तडा गेला आहे. तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल तेच सांगतात. लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या २९ जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसने मुसंडी मारलीच, पण दादरा-नगर हवेली या लोकसभा मतदारसंघात शिवसेना जोरदार विजयी झाली आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येण्याचा मान दादरा-नगर हवेलीच्या कलाबेन डेलकर यांना मिळाला आहे. मोहनभाई डेलकर हे दादरा-नगर हवेलीचे लोकनेते होते. सात वेळा ते याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. या संपूर्ण भागावर त्यांचा प्रभाव होता हे नक्कीच. ते हिंमतबाज लढवय्ये होते, पण केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या सनकी तानाशाही कार्यपद्धतीस विरोध करणाऱ्या डेलकरांना मानसिक ताणतणाव असह्य झाला व शेवटी मुंबईत येऊन त्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला,” असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
“सात वेळा निवडून आलेला एक खासदार प्रशासनाच्या हुकूमशाहीस कंटाळून आत्महत्या करतो ही देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी लाजिरवाणीच घटना होती. डेलकर यांच्या आत्महत्येने फक्त दादरा-नगर हवेलीचीच जनता नव्हे, तर महाराष्ट्र-गुजरातला धक्का बसला. डेलकर कुटुंब त्या धक्क्यातून सावरेल काय? हा प्रश्न होताच, पण शेवटी शिवसेनेच्या आधारात डेलकर कुटुंब आणि तेथील जनता अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज झाली. त्याच लढ्याची पहिली ठिणगी म्हणून कलाबेन डेलकर यांच्या विजयाकडे पाहिले पाहिजे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेची पहिली विजय पताका फडकली आहे व त्या विजय पताकांचे राष्ट्रीय तोरण झाल्याशिवाय राहणार नाही. कलाबेन डेलकर या ५१,२६९ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. हा विजय ऐतिहासिक आहे,” असं लेखात म्हटलं आहे.
“मुंबईतील ‘दादर’ ते ‘दादरा’ असा हा शिवसेनेचा प्रवास दिल्ली दरवाजापर्यंत नक्कीच धडक देईल. दादरा-नगरच्या विजयाने शिवसेनेची, हिंदुत्ववाद्यांची,अन्यायाविरुद्ध लढणाऱयांची दिवाळी अधिक तेजोमय झाली. शिवसेना महाराष्ट्राबाहेर काय दिवे लावणार? असे प्रश्न ज्यांना पडत होते त्यांनी शिवसेना विजयाचे हे तेजस्वी दीप पाहायलाच हवेत. दादरा-नगर हवेलीचा विकास व भयमुक्त प्रदेश या धोरणानेच शिवसेना तेथे काम करील. शिवसेना शब्दाला, वचनाला जागणारा पक्ष आहे याची प्रचीती डेलकर कुटुंबास आणि दादरा-हवेलीच्या जनतेला आल्याशिवाय राहणार नाही. दादरा-नगर हवेलीचा विजय हा नुसता विजय नसून देशातील हुकूमशाही प्रवृत्तीस दे धक्का आहे. असे धक्के देशातील अनेक भागांत बसले आहेत,” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.
“देशभरातील पोटनिवडणुकांच्या निकालांत भाजपाची पीछेहाट झाली आहे. प. बंगालमधील चारही जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या. तीन ठिकाणी भाजपाला अनामत रक्कमही वाचवता आली नाही. तृणमूल काँग्रेसने प. बंगालातून भाजपाला उखडून फेकले आहे. महाराष्ट्रातील नांदेडात देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीतूनही भाजपाचे ‘आयात’ उमेदवार साबणे यांचा अति दारुण पराभव झाला. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी लाखावर मते मिळवून भाजपाच्या आयात उमेदवारास चारीमुंड्या चीत केले. भाजपाकडे निवडणुका लढविण्यासाठी स्वतःचे उमेदवार नाहीत. इकडून तिकडून उधार-उसनवारी करून ते जितमय्याचा आव आणतात, पण जनता शेवटी त्यांना आपटतेच, हे देगलुरात दिसले,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
“भाजपाकडे आता त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते फारसे उरले नसून यापुढे त्यांनी ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पकडून ‘कमळ’ चिन्हावर उभे केले पाहिजे, असे आता जागोजाग लोक चेष्टेने बोलू लागले असतील तर त्या अधःपतनास भाजपा स्वतःच जबाबदार आहे. हिमाचल प्रदेशात भाजपाची वाताहत झाली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघासह तीन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसने भाजपाचा पराभव केला. राजस्थानातही काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. कर्नाटकातील निकालही भाजपासाठी चांगला नाही. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हावेरी जिल्ह्यातील हंगल मतदारसंघातच काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेस दुबळी झाली की संपली असे बोलणाऱ्यांना हाताच्या पंजाने चपराक मारली आहे,” असं म्हणत शिवसेनेनं काँग्रेसच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
“बिहारात नितीश कुमारांनी दोन्ही जागा जिंकल्या. आसामात भाजपाने पाच जागा जिंकल्या. मध्य प्रदेशातही भाजपाने जागा राखल्या हे खरे, पण तेरा राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीतील निकाल त्यांनी दिवाळी साजरी करून नाचावे, असे लागलेले नाहीत. महागाईने लोकांच्या घरातील चुली विझल्या आहेत व लोकांनी महागाईविरोधात मतदान केले, असे हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. याचा स्पष्ट अर्थ असा की, फक्त मोदी नामाचा जप करून निवडणुका जिंकण्याचा काळ संपला आहे. लोकांना भेडसावणारे प्रश्न निवडणुकांचे निकाल बदलतात,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
“हिंदी पट्टय़ात भाजपाविरोधी वातावरण आहे हेसुद्धा दिसते. महाराष्ट्रातील भाजपावाले एक तुणतुणे कायम वाजवत असतात, मोदींमुळे शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. त्यांच्यासाठी दादरा-नगर हवेलीचा शिवसेना विजय सत्यकथन करतोय. गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता, पोस्टरवर त्यांचे चित्र न लावता शिवसेना जिंकली व देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपाला माती खावी लागली. दिवाळीचे फटाके फुटू लागले आहेत. कुणाला दिवाळीनंतर बॉम्ब फोडायचे असतील तर ते फोडावेत. त्या बॉम्बमध्ये दारू शिल्लक आहे काय तेवढेच एकदा बघा. नाही तर हसे व्हायचे. दिवाळीचा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा असा विजय महाराष्ट्राने मिळवला आहे. महाराष्ट्राच्या विजयाचे दमदार पाऊल देश पातळीवर पडले आहे. या पावलाखाली सर्व अमंगल, अन्याय चिरडून जाईल. महाराष्ट्र व जनतेची भरभराट होईल, हीच शुभेच्छा!,” असं लेखात म्हटलंय.

Leave a Reply