कोरोनाकाळात देशात दररोज ३१ मुलांच्या आत्महत्या

नवी दिल्ली : १ नोव्हेंबर – करोनानाळात जगभरात माणसांच्या आयुष्याची अनेक पातळ्यांवर पडझड झाली. त्यातून लहान मुलेही सुटली नाहीत. मुलांच्या भावविश्वावर या काळात मोठे आघात झाले असून, सन २०२० मध्ये देशात दररोज तब्बल ३१ मुलांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव सरकारी आकडेवारीमधून समोर आले आहे. या काळात मुले प्रचंड मानसिक तणावातून गेल्याचे यातून अधोरेखित होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये ११,३९६ मुलांनी आत्महत्या केल्या. २०१९ मध्ये अशा ९,६१३ घटना घडल्या होत्या. त्यात गेल्या वर्षी १८ टक्के वाढ झाली. तर २०१८मध्ये ९,४१३ घटना घडल्या होत्या, त्यात २१ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे. कौटुंबिक समस्या (४,००६), प्रेम प्रकरण (१,३३७) आणि आजार (१,३२७) ही १८ वर्षांखालील मुलांच्या आत्महत्यांची मुख्य कारणे होती. काही मुलांच्या आत्महत्येमागे वैचारिक कारणे, व्यक्तिपूजा, बेरोजगारी, दिवाळखोरी, नपुंसकता किंवा वंध्यत्व आणि अमली पदार्थांचे सेवन ही इतर कारणेही नोंदवली गेली आहेत.
करोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद पडणे, एकटेपणा आणि मोठ्यांबाबतच्या चिंतेमुळे मानसिक आरोग्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केल्याचे ‘सेव्ह द चिल्ड्रेन’चे बाल संरक्षण उपसंचालक प्रभात कुमार यांनी सांगितले. एक समाज म्हणून मनुष्यबळ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षण आणि शारीरिक आरोग्य यांसारख्या गोष्टींबद्दल आपल्याला जाणीव असते. तरीही भावनिक मानसिक आरोग्यासाठी सामाजिक पाठबळ अनेकदा कमी पडते. मुलांमधील आत्महत्यांची वाढती संख्या यंत्रणेचे अपयश दर्शवते. मुलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी अनुकूल परिसंस्था प्रदान करणे ही पालक, कुटुंबे, समाज आणि सरकार यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्याउलट आत्महत्या करणे हा विरोधाभास आहे, असे कुमार यांनी सांगितले.

Leave a Reply