विमानतळाच्या उदघाटन समारंभात रामदास आठवलेंनी उडवले काव्याचे फवारे

मुंबई : ९ ऑक्टोबर – कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थितततीत उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजनेअंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी सर्वच मोठ्या नेत्यांनी भाषणांमध्ये आपलं मत व्यक्त केलं. यावेळी आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये काव्यात्मक फवारे उडवून भाजपा आणि शिवसेना युतीबद्दल भाष्य केलं. आपल्या काव्यात्मक शैलीमध्ये आठवलेंनी शुभेच्छा दिल्या.
“सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार कमान… कारण चिपीमध्ये आलं आहे मुंबईवरुन विमान,” असं म्हणत आठवलेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. पुढे बोलताना आठवलेंनी आपण अजूनही टूरिझम वाढवलं तर या ठिकाणी अनेक ठिकाणाहून विमानं येतील अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे आज राजकारण बाजूला ठेऊन आम्ही एकत्र आलोय, हे सुद्धा आठवलेंनी अधोरेखित केलं. सर्व पक्षीय नेते उपस्थित असणाऱ्या मंचावरुन आठवलेंनी सगळ्या ठिकाणी राजकारण आवश्यक नाही, असंही म्हटलं.
कोकणाच्या विकासाठी हे विमानतळ आवश्यक होतं असं सांगतानाच कोकणामधील पर्यटनाबद्दल आठवलेंनी भाष्य केलं. जगभरातून गोव्यात लोक येतात तशी या विमानतळामुळे कोकणातही येतील असं आठवले म्हणाले. या विमानातून आम्हाला पहिल्यांदाच येण्याची संधी मिळाल्याबद्दल आठवलेंनी आनंद व्यक्त केलं.
त्यानंतर मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे एकत्र बसल्याचं पाहून त्यांच्याकडे पाहत, “इथे एकत्र आले उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे… मला आठवले महायुतीचे गाणे”, असं म्हणत आठवलेंनी आपल्या खास शैलीत सेना भाजपा युतीचा उल्लेख केला. आठवलेची ही टोलेबाजी ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विमानतळासाठी सर्वांनीच एकत्र प्रयत्न केले आहेत, असंही आठवले म्हणालेत.
भाषणाची शेवटही आठवलेंनी एका कवितेनेच केला. “या ठिकाणी सिंधुदुर्गात येणार आहे विकासाची आंधी… म्हणून मला या ठिकाणी मिळाली येण्याची संधी”, असं म्हणत त्यांनी भाषण संपवलं.

Leave a Reply