नागपुरात दोन दिवसात दोन हत्या, शहरात खळबळ

नागपूर : १३ सप्टेंबर – नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दोन दिवसांमध्ये दोन हत्याच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज रात्री पुन्हा एकदा एका तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आवेश पठाण या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात मारेकऱ्यांनी आवेश पठाणवर धार शस्त्रांनी भीषण हल्ला चढवला. पाठीवर आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांनी आवेश पठाणचा गळा चिरला. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे आवेश पठाणचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
धक्कादायक म्हणजे, शनिवारी रात्रीच यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका तरुणाची हत्या झाली होती. शनिवार रात्री अजय भारती याची दारू पिण्याच्या वादातून चुलत भावाने हत्या केली होती. तर रविवारी रात्री आवेश पठाणची हत्या करण्यात आली. कालच्या घटनेत तीन आरोपी असून ते फरार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

Leave a Reply