बच्चू कडूंचा अपघात की घातपात? चौकशी व्हावी – अमोल मिटकरी

अकोला : १२ जानेवारी – राष्ट्रवादी काँग्रेसची फायरब्रँड नेते आणि मुलूखमैदानी तोफ अमोल मिटकरी यांनी बच्चू कडू यांच्या अपघातानंतर काळजी व्यक्त केली आहे. जरी आमचे राजकीय मतभेद असतील, त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष वेगळा असेल, परंतु अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यातील दिव्यांगासाठी केलेलं काम मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. असा व्यक्ती सातत्याने सरकारमध्ये असतानाही सरकारच्या विरोधात बोलतो. आज त्या व्यक्तीला एखादा दुचाकीस्वार येऊन उडवतो अन् गंभीर दुखापत करतो. मला वाटतं काहीतरी काळंबेरं आहे, अशी काळजी मिटकरी यांनी व्यक्त केलीये. तसेच घडलेल्या घटनेची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केलीये.
बच्चू कडू यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याची माहिती आहे. त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. आज अमरावती शहरात सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत बच्चू कडू रोडच्या दुभाजकावर जोरदार आदळल्याने डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागल्याची माहिती आहे. बच्चू कडू यांच्यावर अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, सद्या त्यांना नागपूरच्या रुग्णालयात नेण्यात आलं असून सकाळी प्रकृती उत्तम आहे, असं सांगणाऱ्या बच्चू कडूंची प्रकृती दुपारी कशी खालावली, अशी कुजबूज त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
याच अनुषंगाने आमदार अमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित केली आहे. सध्याच्या सरकारविरूद्ध बच्चू कडूंनी सातत्याने घेतलेली बंडाची, विद्रोहाची भूमिका तर या अपघातामागे नाही ना? असा प्रश्न आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय.

बच्चू कडू हे खुल्या मनाचे राजकारणी आहेत. मनात जे असेल ते बोलणारे नेते म्हणून बच्चूभाऊंची ओळख आहे. जरी आमचे राजकीय मतभेद असतील, त्यांचा पक्ष आमचा पक्ष वेगळा असेल तरी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यातील दिव्यांगासाठी केलेलं काम मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. असा व्यक्ती सातत्याने सरकार मध्ये असतानाही सरकारच्या विरोधात बोलतो. आज त्या व्यक्तीला एखादा दुचाकीस्वार येऊन उडवतो अन् गंभीर दुखापत करतो. या घटनेची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. भाजपच्या एखाद्या नेत्याला खरचटलं तरी भाजपकडून चौकशीची मागणी होते. त्याचप्रकारे आता दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी झगडणाऱ्या नेत्याला एखादा दुचाकीस्वार येऊन उडवत असेल तर त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. या अपघातानंतर मलाही संशय येत आहे. भारतीय जनता पार्टीने एखाद्या व्यक्तीकडून काही करून घेतलं का? अशी शंका उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी अमोल मिटकरी यांनी केलीये.

Leave a Reply