महापुरूषांविषयी बोलत असताना प्रत्येकाने काळजीपूर्वकच बोलले पाहिजे – छत्रपती शाहू महाराज

सातारा :६ जानेवारी – महाराष्ट्रात सध्या छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा वाद सुरू आहे. अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नये अशी भूमिका मांडली होती. यावर चांगलाच वाद झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊनही आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असं म्हटलं होतं. मग देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार जे म्हणत आहेत तो एक प्रकारचा द्रोह आहे असंही म्हटलं. तर अजित पवार यांनी यावरही गुन्हे दाखल करा असं ओपन चॅलेंज दिलंय. याच संपूर्ण विषयावर छत्रपती शाहू महाराज यांनी आपली भूमिका मांडली आहे.
महापुरुषांबाबत कुठलेही वाद निर्माण होता कामा नयेत. महापुरूषांविषयी बोलत असताना प्रत्येकाने काळजीपूर्वकच बोललं पाहिजे. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोलताना प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. लोकशाही म्हटल्यावर भिन्न विचार असतात. कुणाच्या दृष्टीकोनातून काही उपाधी दिल्या जातात. त्यातलं आपल्याला योग्य वाटेल तेच आपण घ्यावं इतर गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सामाजिक भान ठेवणं ही प्रत्येकाकडून अपेक्षा आहे. समाज एकसंध कसा राहिल हे आपण पाहिलं पाहिजे असंही छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या वेळी बोलत असताना अजित पवार यांनी राज्यपालांच्या आणि काही भाजपा नेत्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. राज्यपाल पदी बसलेली व्यक्ती आपल्या राज्यातील आदर्शांचा अपमान कसा काय करू शकते? त्यावर सरकार गप्प का? असंही अजित पवार यांनी विचारलं होतं. तसंच त्याचवेळी संभाजी महाराज यांना धर्मवीर ही उपाधी लावली जाते मात्र ते धर्मवीर कधीच नव्हते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं रयतेचं राज्य म्हणजेच स्वराज्य याचं रक्षण केलं. त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक हेच म्हणणं योग्य आहे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

Leave a Reply