जमिनीचा ताबा मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याने स्वतःला जमिनीत गाडून घेत केले अनोखे आंदोलन

जालना : २ जानेवारी – आजपर्यंत तुम्ही शेतकरी बळी राजाला विविध प्रकारचे आंदोलन करताना पाहिले असेल. मात्र, जालन्यामध्ये एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले. आई, मावशीला जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःला या शेतकऱ्याने जमिनीत गाडून घेत अनोखे आंदोलन केले. ही घटना जालना जिल्ह्यातील हलस येथील आहे. या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओही समोर आला आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत आई आणि मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा त्यांना मिळावा, म्हणून जालन्यातील एका शेतकऱ्यानं अनोख्या पद्धतीने आंदोलन करत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं. जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस या गावात हे आंदोलन करण्यात आलं. सुनील जाधव असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.
जाधव यांच्या आई आणि मावशीला प्रत्येकी 1 हेक्टर 35 आर जमीन मंजूर झालेली आहे. मात्र, असे असतानाही या जमिनीचा अजूनही ताबा मिळालेला नाही. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना जमीन ताब्यात मिळत नसल्यानं जेरीस आलेल्या शेतकऱ्यानं अखेर स्वतःला जमिनीत गाडून घेतले आणि या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन आणि शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
त्यांच्या या आंदोलनानंतर शासन प्रशासन त्यांची मागणी किती लवकर पूर्ण करते, हे पाहणे महत्त्वाचे आहे

Leave a Reply