उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही – रामदास आठवले

सांगली : २ जानेवारी – भीमशक्ती आमच्या पाठीशी असल्याने उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. ठाकरे, आंबेडकर एकत्र आले तरी कॉंग्रेस -राष्ट्रवादी यांच्यामध्ये जागा वाटपावरुन मतभेद होतील. त्यामुळे आघाडीत बिघाडी व्हायला वेळ लागणार नाही, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधला.
भीमशक्ती माझ्या पाठीशी असल्याने ठाकरे व आंबेडकर एकत्र आले तरी त्याचा राजकीय परिणाम फार होणार नाही. राज्यातले शिंदे सरकार भक्कम असून पूर्ण काळ टिकेलच, पण २०२४ मध्ये मोठ्या ताकदीने सत्तेवर येईल. संजय राऊत म्हणतात तसे सरकार अस्थिर नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० तर एनडीएचे ४५० खासदार निवडून येतील. राहूल गांधी पंतप्रधान होणार नाहीत. त्यांची भारत जोडो यात्रा भारत तोडो असून अगोदर कॉंग्रेस जोडो यात्रा करायला हवी, असेही आठवले म्हणाले.
छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आहे त्या निमित्त, ५ आणि ६ मे तारखेला कोल्हापूरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिवेशन आयोजित केले आहे. ६ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत असेही आठवले यांनी सांगितले.

Leave a Reply