भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याचं प्रतिक – जितेंद्र आव्हाड

नागपूर : ३० डिसेंबर – कोरेगाव भीमा येथे दरवर्षी १ जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. दरम्यान महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सेंगर यांनी शौर्य दिनाला विरोध केला असून शासकीय कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यानंतर वादाला तोंड फुटलं आहे. सेंगर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी १ जानेवारीला आपण भीमा कोरेगावला जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार असल्याचं म्हटलं आहे. “भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ हा आमच्या शौर्याचं प्रतिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १ जानेवारीला तिथे जाऊन आमच्या पूर्वजांना मानवंदना देत होते. तेव्हा सुद्धा त्यांना तिथे जाण्यापासून रोखण्याची कोणी हिम्मत केली नव्हती,” असं आव्हाड म्हणाले आहेत.
होय आम्हीही तिथे जाणार आणि आमच्या पूर्वजांना मानवंदना देणार असंही त्यांनी सांगितलं आहे
खरात गटाचे प्रमुख सचिन खरात यांनी माहिती दिली की, “करणी सेनेची ही मागणी अत्यंत चुकीची आहे. त्यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी १८१८ साली स्वाभिमानासाठी आणि जातीअंतासाठी पेशव्यांमध्ये आणि महार सैनिकांमध्ये युद्ध झाले. या युद्धामध्ये महार सैनिकांचा विजय झाला. यामुळे हा भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहोत की, अजय सेंगर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करावी.”

Leave a Reply