देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडला, तर राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही – नवनीत राणा

नागपूर : २७ डिसेंबर – नागपूर येथील अधिवेशनात बरेच बॉम्ब फोडणार आहोत. अख्ख्या महाराष्ट्रात फिरुन तुमची झोप उडवणार, कारण तुमची पाप भरली आहेत. मी ज्या कोठडीत होतो, त्यात तुम्हालाही टाकणार, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता. यावरून आता खासदार नवनीत राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोणता बॉम्ब कोण फोडणार, यात विदर्भातील लोकांना रस नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
नवनीत राणा प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. तेव्हा उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे. “अडीच वर्षात एकाही प्रकल्पाचं उद्घाट्न केल्याचं उद्धव ठाकरेंना आठवत नसेल. विदर्भ आणि महाराष्ट्रातील जनतेला विकास काम हवी आहेत. आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी विधानसभा नाही. विधानसभेच्या प्रत्येक मिनीटासाठी महाराष्ट्रातील नागरिक पैसै भरतात. त्यामुळे विधानसभेत जनतेच्या प्रश्नांबद्दल बोललं पाहिजं,” असे आवाहन नवनीत राणांनी केलं आहे.
“कोण कोणता बॉम्ब फोडेल, यात विदर्भातील लोकांना काही रस नाही. अडीच वर्षात काय काम केली, याची दहा नावं सांगावी. पण, काम करताना प्रत्येक व्यक्तीकडून चुक होते. जर, ते बाहेर काढण्यास सुरुवात केली तर, यांना जड जाईल. देवेंद्र फडणवीसांनी लवंगी फोडली तर भारी पडेल. मात्र,देवेंद्र फडणवीसांना फटाके फोडण्यात रस नाही,” असे नवनीत राणांनी म्हटलं आहे.
“संजय राऊत यांच्या पक्षातील ४० आमदार बाळासाहेबांचे विचार अर्थात भाजपाबरोबर गेले आहेत. हा बॉम्ब आधीच फुटला आहे. आता जो बॉम्ब फुटेल कदाचीत आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील. देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडला, तर संजय राऊतांना कुठं पळायचं आणि कुठं लपायचं सुचणार नाही. त्यामुळे बॉम्ब फोडण्याची भाषा विदर्भ आणि नागपूरमध्ये करु नये,” असं आमदार रवी राणांनी म्हटलं आहे.

Leave a Reply