अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, विधानपरिषद दिवसभरासाठी तहकूब

नागपूर : २६ डिसेंबर – ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे देऊन पदाचा दुरुपयोग करून निर्णय घेतल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा व त्यांची चौकशी करण्याची मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. या मुद्द्यावर आज सभागृहात गदारोळ झाल्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
२८९ अनव्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणले.
रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी सत्तार यांनी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीने भूखंड, वाळूचे ठेके, कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन आपल्या अधिकार कक्षात नसतांना विकल्याचा किंवा वाटप केल्याचा आरोप केला. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील सत्तार यांना फटकारले होते याचा उल्लेख देखील दानवे यांनी केला. अशा मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे, तसेच सभागृहात यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.
एकूण ५ प्रकरण ही न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचे आदेश डावलून सत्तार यांनी स्वतः निर्णय घेतल्याचे दाखले दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून बेकायदेशीररित्या निर्णय घेतलेली एकूण ५ प्रकरणे असून एकूण ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीररित्या दिले,
सविता थोरात यांची मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद रत्नागिरी कोकण प्रादेशिक विभागिय आयुक्त या प्रकरणातही कोकण विभाग आयुक्त व अधिकारी यांना अज्ञानात ठेऊन सत्तार यांनी निर्णय घेतला, तसेच संभाजीनगर येथील जयेश इन्फ्रा सावंगी नावाच्या कंपनीला सत्तार यांनी अधिकार नसतानाही नियमबाह्य व बेकायदेशीर आदेश दिले होते, संभाजीनगर मध्ये ही अधिकार नसताना वाळू ठेकेदार यांना वाळूपत्ता बदलून देण्याचं काम केलं, संभाजीनगर जिन्सी येथील कृषी बाजार समितीच्या जागेबाबत ही सत्तार यांनी कार्यक्षमतेबाहेर जाऊन चुकीचा निर्णय दिला. इत्यादी माहिती दानवे यांनी यावेळी दिली.
तत्पूर्वी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज प्रश्नोत्तराचा तास पुकारण्यापूर्वीच 289 प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना केली होती. परंतु प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर यासाठी वेळ देता येईल असे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी तूर्तास त्यांचा प्रस्ताव राखून ठेवला.
प्रश्नोत्तराचा तास आटोपल्या नंतर विरोधी पक्ष नेत्यांनी 289 चा प्रस्ताव सादर करून औरंगाबाद येथील गायरान जमिनीचा प्रश्न उचलून धरला. तसेच यासंदर्भातील भ्रष्टाचार आणि चौकशी असे विषय त्यांनी लावून धरले. दरम्यान याचवेळी सत्ताधारी बाकावरून पण एकच गोंधळाला सुरुवात झाली.
दोन्ही बाजूंनी वाढता गोंधळ लक्षात घेता उपसभापतींनी नियम 35 अन्वये दिलेला 289 चा प्रस्ताव आपण फेटाळत असल्याचे सांगत सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित केले.

Leave a Reply