फाईलींची लढाई सुरू झाली तर जड जाईल – संजय राऊत

नवी दिल्ली : २२ डिसेंबर – ‘आदित्य ठाकरेंवर जे आरोप केले आहे, त्याला शुद्ध मराठी भाषेत हलकटपणा आणि नीचपणा म्हणत आहे. ज्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे, ते आरोप करताय. तुमच्या घरातल्या सुद्धा फायली निघू शकतात. फाईलींची लढाई सुरू झाली तर जड जाईल, असा इशाराच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. याच मुद्दावर संजय राऊत यांनी शेवाळे यांच्यावर सडकून टीका केली.
‘शेवाळे हा किरकोळ माणूस आहे, जो सदस्य सदनात नसतो त्याचं नाव घेता येत नाही. असा लोकसभेचा नियम आहे. हे ठरवून चाललं आहे. मुख्यमंत्र्यांविरोधात आरोप होत आहे, म्हणून अशी विधान करत आहे. अशा कितीही फाइल निघतील. तुमच्या घरातल्या सुद्धा फायली निघू शकतात. फाईलींची लढाई सुरू झाली तर जड जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
कोण बिहार पोलीस आहे, महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का? सीबीआयवर तुम्हाला विश्वास नाही का? सीबीआयने क्लिन चिट दिल्यानंतर तुम्हाला विश्वास नाही का? असा संतप्त सवाल राऊत यांनी केला.
सुशांत सिंह राजपूत प्रकरण त्यावेळी विरोधक पक्षाने अशा पद्धतीने उभं केलं आणि ते त्यांच्यावरच उलटलं. सुशांत सिंह राजपुत यांची आत्महत्या होती हे सीबीआयने सांगितली आहे. ज्याच्यावर बलात्कार आणि विनयभंगाचे आरोप आहेत. कालपर्यंत जो शिवसेनेच्या ताटात जेवत होता, त्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करणे म्हणजे जे फुटीर लोग किती खालच्या स्तरावर गेले आहे हे दिसून येत आले, अशी टीका राऊत यांनी केली.

Leave a Reply