कं चे भा गु बे व “- प्रकाश एदलाबादकर

मी माझ्या आयुष्यातील जवळपास ३९ वर्षे गणित ह्या विषयाचे अध्यापन केले . जुने पारंपरिक गणित ते आधुनिक गणित असा हा प्रवास आहे . गणित मला एकेकाळी घाबरवणारा परंतु नंतरच्या काळातील माझा अत्यंत आवडता विषय . एवढे काय ठेवले आहे त्या गणितासारख्या रुक्ष आणि आकडेमोडीच्या विषयात ,असे अनेक जण मला विचारतात . परंतु आयुष्याची अनेक गणिते , प्रॉब्लेम्स ,रायडर्स सोडवायला मला गणितानेच शिकविले . माध्यमिक शाळेत असताना पदावली(पॉलिनॉमीयल्) सोडविणायची उदाहरणे असत . त्यासाठी सूत्र होते ” कं चे भा गु बे व ” !!

हेच खरे आयुष्याचेही सूत्र आहे . संकटांच्या आणि सुखांच्या अनेक पदांनी गुंफलेली पदावली म्हणजे आयुष्य .ती पदावली सोडविण्याचे कौशल्य गणितानेच दिले . आपल्या भोवतीचे अहंकाराचे कंस प्रथम सोडवावे लागतात . कोण कोणा ‘चे ‘ आणि कोण’चे ‘ आपले हे ‘ चे ‘ ,अहंकाराचा कंस काढल्या शिवाय कळत नाही . ते कळले की ,चांगल्या वाईटाचा भागाकार करून नंतर सद्गुणांचा गुणाकार करावा लागतो . हाती आलेल्या सद्गुणांची बेरीज करताना हलकेच चुकून अंगाशी आलेल्या दुर्गुणांची वजाबाकी केली की ,जीवनाचा मार्ग सुकर होतो . परंतु हे सगळे हाती यायला आयुष्याचे गणित सोडविणायची खूप प्रॅक्टिस करावी लागते . म्हणूनच कठोर परिश्रम,डोळस निरीक्षण आणि सतत प्रयोगशील वृत्ती हे गणिताचे अधिष्ठान आहे . पण आज हे सगळे लिहायचे कारण काय ?कारण आज राष्ट्रीय गणित दिवस आहे .

जगप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मरणार्थ दरवर्षीचा २२ डिसेम्बर हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो . २२ डिसेम्बर १८८७ हा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस ! आपल्या देशात अत्यंत प्राचीन काळापासून गणित विषयाचे संशोधन करून त्यात नवनवीन तथ्ये आणि माहितीची भर घालणारे अनेक दिग्गज गणिती होऊन गेले . आर्यभट्टापासून लीलावातीकार भास्कराचार्यांपर्यंत आणि श्रीनिवास रामानुजन पासून लोकमान्य टिळकांपर्यन्त !तसेच आजही अनेक गणिती विद्यमान आहेत .

एक अध्यापक म्हणून मी सातत्याने ३९ वर्षे गणित याच विषयाचे अध्यापन केलेले आहे . गणिताची शिस्त आणि गणितातील काव्य यांचे ज्याला आकलन झाले तो कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतो .महाराष्ट्राच्या एस. एस . सी. बोर्डाने १९७२ सालापासून नवीन गणिताचा सूत्रपात केला . त्यापूर्वी आम्ही पारंपरिक अंकगणित ,बीजगणित आणि भूमिती शिकलो आणि शिकविलेही . १९७२ साली नवीन गणिताचे अध्यापन आणि अध्ययन सुरु झाले . नवीन गणिताची ,दहाव्या वर्गाची पहिली बॅच १९७५ साली मॅट्रिकला बसली. त्यापूर्वी आम्हा गणित अध्यापकांसाठी नवीन गणिताचे अनेक ‘इनसर्विस ट्रेनिंग सेमिनार्स ‘ झाले .

आमचे असेच एक सेमिनार १९७२ सालच्या उन्हाळ्यात नागपूरच्या मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात झाले होते . मोहता विज्ञान महाविद्यालयाचा गणित विभाग हा त्या काळात ,संपूर्ण नागपूर विद्यापीठात सर्वश्रेष्ठ होता . प्रा .मुटाटकर ,प्रा .दप्तरी ,प्रा. इंदूरकर ,प्रा . मंगळगिरी ,प्रा. व्यवहारे असे गणिताचे एकापेक्षा एक निष्णात प्राध्यापक या महाविद्यालयात होते . त्या सेमिनार मध्ये आम्हाला हेच प्राध्यापक शिकवायला होते . अभ्यासक्रमात नवीन गणित सुरु करावे ही संकल्पना ,नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन गणित विभाग प्रमुख डॉ. भास्कर सदाशिव फडणीस यांची होती . आमच्या ह्या सेमिनारच्या उदघाटनाला ते आले होते .अत्यंत विद्वान व्यक्ती. आपल्या सानुनासिक आवाजात त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले आणि त्यांनी समारोप करताना जे सांगितले ते मी आजवर मनात कोरून ठेवलेले आहे . कारण नंतरच्या काळात साहित्य ,नाटक , लेखन , वक्तृत्व ,सूत्रसंचालन ,कार्यक्रमाचे आयोजन अशा सर्वच क्षेत्रात वावरताना गणिताची सर्वश्रेष्ठता आकलन होत गेली .

डॉ. फडणीस म्हणाले होते ” मित्रांनो तुम्ही गणिताचे विद्यार्थी आहेत .शिक्षकही आहात . एक गोष्ट मनात पक्की कोरून ठेवा .गणित हा सर्व शास्त्रांमध्ये सर्वश्रेष्ठ विषय आहे . आयुष्याला गणिताशिवाय अर्थ नाही आणि गणिताला पर्याय नाही ” असे म्हणून त्यांनी एक श्लोक सांगितला …

” यथा शिखा मयूराणां नागानां मणयो यथा ।
तद्वेदांग शास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितं ।।
ज्या प्रमाणे मोराच्या डोक्यावर त्याचा सुंदर तुरा शोभून दिसतो ,नागाच्या मस्तकावर त्याचा तेजस्वी मणी शोभून दिसतो त्याचप्रमाणे सर्व शास्त्रांच्या मूर्धास्थानावर गणित शोभून दिसते. “

आज डॉ. फडणीस नाहीत आणि आम्हाला शिकविणारे प्राध्यापकही नाहीत परंतु त्यांनी सांगितलेले हे गणित स्तवन विसरणे शक्य नाही .

प्रकाश एदलाबादकर , नागपूर

Leave a Reply