एका 32 वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं आहे – आदित्य ठाकरे

नागपूर : २२ डिसेंबर – “एका 32 वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं आहे, त्यामुळे बदनामीचे प्रयत्न सुरु आहेत,” अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि रिया चक्रवर्तीच्या फोन कॉलमधील AU नावावरुन हिवाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. त्यानंतर आदित्य ठाकरे नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
‘एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलंय’
आदित्य ठाकरे म्हणाले की, “एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलंय. म्हणूनच बदनामीचे प्रयत्न होत आहेत. जनतेला माहित आहे, आज हे गद्दार मुख्यमंत्री ज्या घोटाळा प्रकरणात अडकले आहेत, ते आम्हाला सभागृहात सादर करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्ष हे सतत वेलमध्ये येत आहे आणि अध्यक्ष, तालिका अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत. त्या बाजूला 14 जणांना बोलू दिलं, तेही एकापाठोपाठ. अडीच वर्षात मी तरी असं हाऊस सुरु असल्याचं पाहिलं नाही. मी लहानपणापासून टीव्हीवर अधिवेशन पाहिलंय. पण सत्ताधारी पक्ष वेलमध्ये येऊ आंदोलन करतोय, असं कधीच दिसलं नाही.”
“यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्यपाल हटाओ आम्ही जी सातत्याने मागणी करत आहोत, ज्या महाराष्ट्रद्वेशी राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महात्मा फुलेंचा अपमान केला. त्यांना वाचवण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जे काही शोधायचंय ते शोधू द्यात. महत्त्वाची गोष्ट एकच आहे की, NIT चा घोटाळा आम्हाला सभागृहात सादर करु न देण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
नाव घेण्याची हिम्मत नाहीये यांच्यात, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या काही लोकांकडे मी लक्ष देत नाही. पण जसं मी सांगितलं की, एका 32 वर्षांच्या तरुणाने एका खोके सरकारला हलवून ठेवलंय, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply