राजस्थानमध्ये उज्वला योजनेतील गरिबांना मिळणार ५०० रुपयांत सिलिंडर

जयपूर : २० डिसेंबर – राजस्थानमध्ये काँग्रेसला सरकारला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. २०२४ साली विधानसभेच्या निवडणुका राजस्थानात पार पडणार आहे. त्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गरिबांसाठी मोठी घोषणा केली आहे. राजस्थानमध्ये आता ५०० रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधींच्या उपस्थितीत अलवर जिल्ह्यात झालेल्या ‘भारत जोडो यात्रे’च्या सभेत गेहलोत यांनी ही घोषणा केली.
अशोक गेहलोत म्हणाले, “राजस्थानच्या अर्थसंकल्पाची तयारी सुरु करण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेअंर्तग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना गॅस सिलेंडर दिले. मात्र, ते आता रिकामेच राहिले आहेत. कारण, गॅस सिलेंडरचे दर ४०० रुपयांवर १०४० रुपयांपर्यंत गेले आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील आणि उज्ज्वला योजनेअंर्तगत येणाऱ्यांना एक एप्रिलपासून ५०० रुपयांना गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.”
“महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार पाऊल उचलत आहे. सरकार ५० युनिटपर्यंत मोफत वीज देत आहे. तर प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांना १००० रुपये देण्यात येत आहेत. आम्ही एक कोटी लोकांना पेन्शन देत आहोत. तसेच, करोना कार्यकाळात सरकारने चांगलं काम केलं. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून, सरकारचे कौतुक केलं आहे,” असं गेहलोत यांनी सांगितलं.
केंद्रातील मोदी सरकारवर अशोक गेहलोत यांनी हल्लाबोल केला आहे. “देशात लोकशाही कमकुवत होत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा भीतीच्या छायेखाली काम करत आहेत. पूर्वी लोक, अंमलबजावणी संचालनालय ( ईडी ), आयकर विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग ( सीबीआय ) यांना घाबरत होते. पण, आता यंत्रणांना वरून काय आदेश येईल, या विचाराने भीती वाटते. संपूर्ण देश बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त आहे. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असताना देशात फूट निर्माण केली जात आहे,” असा आरोप गेहलोत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला आहे.

Leave a Reply