देशाच्या राज्यकर्त्यांनी असुरक्षित झालेल्या सीमांवर लक्ष द्यावे – संजय राऊत

मुंबई : १३ डिसेंबर – अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाले असून यानंतर राजकारण तापलं आहे. ९ डिसेंबरला दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आले होते. २० जवान शहीद झालेल्या अडीच वर्षांपूर्वीच्या गलवान संघर्षांनंतरची ही पहिलीच घटना आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आठ दिवसांनी ही माहिती समोर आली असून, देशाचे संरक्षणमंत्री काय लपवत आहेत? अशी विचारणा केली आहे.
“गुजरातमधील तसंच देशातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत चीन शांत होतं की त्यांना शांत राहण्यास सांगण्यात आलं होतं. लडाख, डोकलामनंतर आता तवांगमध्ये घुसले आहेत. लडाखमधून चिनी सैन्य बाहेर काढल्याची चर्चा झाली आणि आता तवांगमध्ये घुसले आहेत. देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारण, तपास यंत्रणा, विधानसभा, विरोधी पक्ष यावर लक्ष देण्यापेक्षा असुरक्षित झालेल्या सीमांवर लक्ष द्यावं,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिली आहे.
“चीनसारखा शत्रू तिन्ही बाजूंनी घुसत आहे, तिथे लक्ष दिलं तर खऱ्या अर्थाने राष्ट्राची सेवा होईल. विरोधी पक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करु. परिस्थिती गंभीर आहे. सरकार राजकारणात गुंतून असल्याने चीन, पाकिस्तान आणि इतर सगळे शत्रू धडका मारत आहे आणि सरकार गांभीर्याने घेत नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
“पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी देशापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न सातत्याने केल्याचं तवागमधील घटनेवरुन स्पष्ट दिसत आहे. तवांगमध्ये शुक्रवारी चकमक झाली आणि आठ दिवसांनी हे प्रकरण समोर आलं आहे. जखमी सैनिक गुवाहाटीमधील रुग्णालयात उपचार घेत आहे. सत्य काय आहे हे कळायला मार्ग नाही. आपले किती सैनिक जखमी झाले आहेत, काही जवान शहीद झाले आहेत का? यासंबंधी सरकार अधिकृत माहिती देत नाही. गलवानसंबंधी झालं तेच तवांगसंबंधी दिसत आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
“गुजरात निवडणुका जिंकल्याचा उत्साह सुरु असताना चीनचं सैनिक तवांगमध्ये घुसखोरी करत होतं. याचा अर्थ तुम्ही या देशाच्या सुरक्षेचंहा राजकारण आणि उत्सव केला आहे. राजकारण कोणत्या थराला गेलं आहे हे पहायचं असेल तर तवांगमधील घटना देशाच्या दृष्टीने दुर्दैवाची आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“अरुणाचल प्रदेशात चीन पहिल्यांदा घुसलेलं नाही. याआधी त्यांनी अनेकदा त्यांना त्या प्रदेशावर आपला दावा सांगितला आहे. हे आमच्या सरकारला माहिती नाही का?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली. चीनने नकाशात कायम अरुणाचल प्रदेश त्यांचा भाग दाखवला आहे. अशावेळी भारतीय संरक्षण दलाने, सरकारने अधिक सावधानपणे काम करणं गरजेचं होतं, तसं होताना दिसत नाही अशी टीका संजय राऊतांनी केली.

Leave a Reply