महावितरणला कंटाळून शेतकऱ्याने आपल्याच शेतातील ४०० संत्र्याच्या झाडांवर चालवली कुऱ्हाड

अमरावती : ७ डिसेंबर – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणला कंटाळून अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं आपल्या शेतातील 400 संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याची घटना घडली. अचलपूर तालुक्यातील जवळापूर येथील गणराज कडू असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ही कुऱ्हाड झाडावर नाहीतर माझ्या जीवावर पडत असल्याची भावनाही यावेळी गणराज कडू यांनी व्यक्त केली. आपल्या शेतात विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गणराज कडू हे गेल्या काही दिवसांपासून सदर विभागाकडे तक्रारी करत होते. मात्र, त्यांना न्याय भेटला नसल्यानं त्यांनी 400 संत्र्यांच्या झाडावर कुऱ्हाड चालवल्याचा निर्णय घेतला.
सरकार उत्पन्न वाढवा म्हणत आहे. मात्र, महावितरण व्यवस्थीत वीज पुरवठा करत नसल्याचे गणराज कडू म्हणाले. मी वेळोवेळी महावितरणकडे वीज पुरवठ्याबाबत तक्रारी दिल्या होत्या. मात्र, माझ्या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे कडू म्हणाले. वीज नसल्यामुळं संत्रा बागेसह हरभरा आणि कांदा पिकाला पाणी मिळत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. ही कुऱ्हाड झाडावर नाहीतर माझ्या जीवावर पडत असल्याची भावनाही यावेळी गणराज कडू यांनी व्यक्त केली. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण आहे. म्हणून शासनानं महावितरणवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील गणराज कडू यांनी केली.
अमरावती जिल्ह्यात गेल्या सहा ते सात वर्षापासून संत्राबागेमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळती होत आहे. ही फळगळती जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात होते. चांदूरबाजार तालुक्यातील अनेक संत्रा उत्पादकांनी फळगळतीची समस्या कायमची सोडवण्यासाठी नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रावर धडक देऊन वारंवार निवेदने दिली. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे संशोधन केले नसल्याने शेतकऱ्यांना सतत नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळं काही संत्रा उत्पादकांनी आपल्या शेतातील संत्रा बागेवर कुऱ्हाड चालवली होती. दुसरीकडं संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी सध्या छोट्या आकाराची संत्री फेकून देत आहेत. बांगलादेशने भारतातून त्यांच्या देशात आयात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळं बांगलादेशात वैदर्भीय संत्री महाग होऊन त्यांचा पुरवठा कमालीचा घटला आहे

Leave a Reply