साखरपुड्याच्या जेवणातून ६० जणांना विषबाधा

अमरावती : ५ डिसेंबर – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे एका साखरपुडा समारंभात जेवण केल्यानंतर सुमारे ६० जणांना अन्नातून विषबाधा विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अचलपूर येथील प्रहार पक्षाचे माजी नगरसेवक अनिल पिंपळे यांच्या मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अष्टमासिद्धी येथील मंगल कार्यालयामध्ये पार पडला.
या साखरपुडा समारंभात वधू-वरांकडे नातेवाईकांसह मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ६० च्या वर लोकांना रविवारी सांयकाळ – पासून उलट्या, मळमळ, हगवण, पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णांवर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयासह परतवाडा आणि नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांचाही समावेश आहे. अचानक एवढे रुग्ण दाखल झाल्याने रुग्णालयात एकच तारांबळ उडाली होती. रुग्णांची तपासणी केल्यानंतर या सगळ्यांना अन्नातून किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

Leave a Reply