राज ठाकरेंनी पवारसाहेबांवर केलेला आरोप धादांत खोटा – अजित पवार

मुंबई : २ डिसेंबर – राज ठाकरेंनी पवारसाहेबांवर केलेला आरोप धादांत खोटा आणि बिनबुडाचा असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. पवारसाहेबांचं नाव घेतलं की बातमी होते, त्यामुळंचं अशा प्रकारचे वक्तव्य केलं जात असल्याचे पवार म्हणाले. अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं.
राज ठाकरे ज्यावेळेस पवारसाहेबांची मुलाखत घेत होते, तेव्हा त्यांच्याबद्दल काय बोलत होते. म्हणजे इतकं दुटप्पी माणसाने वागू नये असे अजित पवार म्हणाले. पवारसाहेबांना 55 वर्षापासून उभा महाराष्ट्र ओळखत आहे. 55 वर्षात साहेबांनी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेवला. तशाच पद्धतीने सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केल्याचे अजित पवार म्हणाले. राज ठाकरेंचा आरोप हास्यास्पद असल्याचे अजित पवार म्हणाले.
जातीच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या काही गोष्टी समोर आणल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे सुरू असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात हे प्रकार सुरू झाले असल्याचे त्यांनी म्हटले होते. शरद पवार हे नेहमी शाहू फुले आंबेडकर हीच नावे घेतात. शिवाजी महाराजांचे यामध्ये नाव घेत नाहीत. इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडण्याचे काम सुरू असून 1999 पासून राज्यात विष कालवले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे हे सध्या पक्षाच्या बैठकांच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Leave a Reply