इंदोर : २७ नोव्हेंबर – राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा सध्या मध्य प्रदेशात आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांचं जन्मस्थान असलेल्या मध्यप्रदेशातील महू या गावात पोहोचलेल्या राहुल गांधींचं जोरदार स्वागत करण्यात आलं. काल (शनिवारी) राहुल गांधी यांनी इंदूरमधील महू येथे जाहीर सभेला संबोधित केलं. या सभेत संबोधित करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आरएसएस आणि भाजपवर निशाणा साधला.
महू येथील जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, इतर कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते 3500 किमीचा प्रवास करु शकणार नाहीत. भाजप आणि आरएसएसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, “आज काही लोक संविधान नष्ट करण्यात मग्न आहेत. संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत. आरएसएस आणि भाजपचे लोक हे संविधान नष्ट करू शकत नाहीत. आरएसएसला संविधानाची ताकद संपवायची आहे.”
राहुल गांधी यांनी आज्जी इंदिरा गांधी आणि वडिल राजीव गांधी यांची आठवण काढत म्हणाले की, “माझ्या आज्जीला 32 गोळ्या घालण्यात आल्या होत्या. वडिलांना बॉम्बनं उडवण्यात आलं. माझ्याविरोधात हिंसा करण्यात आली. एवढ्या हिंसाचारानंतरही मनात भीती नाही आणि त्यामुळे द्वेष नाही. माझ्या मनात आरएसएस, मोदी, अमित शहा यांच्याबद्दल द्वेष नाही. भाजप, नरेंद्र मोदी आणि अमित शहांना माझं आवाहन आहे की, मनातून भिती दूर करा, द्वेष आपोआप दूर होईल. तुमच्या भीतीनं तुम्ही देशाचं नुकसान करत आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “जे प्रेम करतात ते घाबरत नाहीत आणि जे घाबरतात ते प्रेम करत नाहीत.”
“भारत जोडो यात्रेदरम्यान आम्ही जवळपास 2 हजार किलोमीटरपर्यंत चाललोय. ही यात्रा महूमध्ये एकाच ठिकाणी वळवण्यात आली आहे, कारण ती आंबेडकरांची भूमी आहे. महूमध्ये जनतेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, “ही आंबेडकरांची, संविधानाची आणि तिरंग्याची भूमी आहे. तिरंगा हे संविधानाच्या शक्तीचं प्रतीक आहे. पण देशातील एका संघटनेनं (RSS) 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही. भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात प्रथमच संविधानानं सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, नोटाबंदी आणि कोरोना (लॉकडाऊन) च्या काळात जे काही घडलं, त्यामागे देशातील तीन ते चार अब्जाधीशांची ताकद आहे. महागाईचा संदर्भ देत राहुल यांनी जनतेला विचारलं की, यूपीएच्या काळात सिलेंडर 400, पेट्रोल 60, डिझेल 55 टक्के होतं. आता काय किंमत आहे? बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरत राहुल गांधी म्हणाले की, सरकारचं धोरण आहे की, इंजिनिअरिंग करा आणि मजूर व्हा, चार वर्ष सैन्यात जा आणि मग मजूर व्हा! नोटाबंदी, जीएसटी आणि खाजगीकरण हे गरिबांना उद्ध्वस्त करण्याचं हत्यार असल्याचंही राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.