पंतप्रधानांना विनंती प्लिज राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा

मुंबई : २० नोव्हेंबर – राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कोश्यारींना महाराष्ट्रातून बाहेर पाठवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असून नवीन आदर्श हे नितीन गडकरींसारख्या व्यक्ती आहेत अशा अर्थाचं विधान कोश्यारींनी आज जाहीर कार्यक्रमात केलं. आता सर्वच स्तरामधून या वक्तव्याचा निषेध केला जात असतानाच संभाजीराजे छत्रपतींनी थेट राज्यपालांना राज्याबाहेर पाठवण्याची मागणी केलीय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. सर्वच स्तरातून राज्यपालांच्या या विधानावर आक्षेप घेतला जात आहे.
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील”, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
परभणीमध्ये पत्रकारांनी राज्यपालांच्या या विधानाचा संदर्भ देत संभाजीराजेंना प्रश्न विचारला. त्यावर संभाजी राजेंनी संताप व्यक्त करताना राज्यपालांना राज्याबाहेर पाठावावे अशी मागणी केली. “हे राज्यपाल असं का बडबडतात मला अजूनही समजत नाही. मी तर म्हणतो यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवून द्या,” अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी आपला संपात व्यक्त केला. “मी हात जोडून पंतप्रधानांना विनंती करतो की यांना प्लीज.. प्लीज म्हणतोय मी प्लीज… प्लीज यांना बाहेर पाठवा. अशी व्यक्ती आम्हाला महाराष्ट्रात नकोय. जी व्यक्ती महाराष्ट्र वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच बाकी महापुरुषांबद्दल तसेच संतांची भूमी असताना इतकं घाणेरडं बोलतात. इतका घाणेरडा विचार घेऊन येऊ कसे शकतात? यानंतरही यांना राज्यपालपदी ठेवतात तरी कसं?” असं म्हणत आपला संताप व्यक्त केला आहे. परभणीमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.
“राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो. ते सातत्याने अशी विधानं करत अशतात. शिवाजी महाराज हे जागतिक स्तरावरचे आदर्श नेते होते. शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही आणि कशाशीही होऊ शकत नाही”, अशी प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.

Leave a Reply