उद्धव ठाकरेंनी चुल्लू भर पाण्यात डुबून मरायला पाहिजे – रवी राणा

अमरावती : १८ नोव्हेंबर – महाराष्ट्रातल्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका काही संपण्याचं नाव घेत नाहीये. आता आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेयांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधीयांनी सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. भाजप, शिंदे गट आणि मनसेने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला. तर उद्धव ठाकरे यांनीही त्यांची भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंनी मांडलेल्या त्यांच्या भूमिकेवर रवी राणा यांनी निशाणा साधला.
‘राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचं उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी चुल्लू भर पाण्यात डुबून मरायला पाहिजे,’ असं वादग्रस्त वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे. तसंच देशविरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी आणि त्यांना समर्थन देणारे उद्धव ठाकरे यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा रवी राणा यांनी दिला आहे. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपण राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे सांगतानाच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. स्वातंत्र्य आंदोलनात भाजप आणि त्यांची संघ कुठे होता? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधींनी केलेल्या या वक्तव्याविरोधात ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातला राहुल गांधीविरोधातला हा दुसरा गुन्हा आहे. याआधी भिवंडीतल्या प्रचार सभेत आरएसएसविरुद्ध बोलल्याप्रकरणी भिवंडीमध्येही राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Reply