राहुल गांधी यांच्या विरोधात पोलीस तक्रार करणार – रणजित सावरकर

मुंबई : १७ नोव्हेंबर – काँग्रेस नेते राहुल गांधी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. नेहरू यांनी 1921 मध्ये नागरिकांना आयकर भरू नका असे आवाहन केले होते. मात्र, स्वत: तुरुंगात असताना आयकर भरला. चळवळीपासून द्रोह केलेल्या नेहरूंनी तीन दिवसात देशाची फाळणी काँग्रेसला न विचारता मान्य केली. हा देशद्रोह असून नाना पटोले आणि काँग्रेसने याचे उत्तर द्यावे असे आव्हान रणजित सावरकर यांनी दिले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल गांधी बिरसा मुंडा यांच्याशी सावरकरांची तुलना करताना बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांनी निडरपणे दोन हात केले. तर, सावरकरांनी अंदमानात जाताच ब्रिटिशांकडे माफी मागितली असल्याची टीका केली होती. त्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. आज रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसकडून सुरू असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
त्यांनी म्हटले की, इंदिरा गांधी यांनी सावरकरांचा सन्मान केला होता. सावरकर स्मारकातही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. सावरकरांवर टीका करणे हे एका रणनीतिचा भाग आहे. हिंदुत्ववादी शक्तिंकडे 1998 च्या सुमारास वाजपेयींच्या नेतृत्वात सत्ता आल्यानंतर सावरकरांविरोधातील आरोपांना सुरुवात झाली होती. त्यानंतर युपीए सरकारच्या 10 वर्षाच्या काळात हा वाद शांत झाला होता. आता, 2014 नंतर हा वाद पुन्हा सुरू झाला आहे. सत्तेच्या खेळात महापुरुषांची बदनामी करू नये असेही रणजित सावरकर यांनी म्हटले. सावरकर यांच्यावरील आरोपांना आम्ही याआधीच उत्तरे दिली आहेत. त्यासाठी एक पुस्तिकाही काढली आहे. सावरकरांनी कधीही माफी मागितली नाही, असे ब्रिटिशांनी सांगितले असल्याचा दावा रणजित सावरकर यांनी केला आहे.
रणजित सावरकर यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. नेहरू यांनी 1921 मध्ये नागरिकांना आयकर भरू नका असे आवाहन केले होते. मात्र, स्वत: तुरुंगात असताना आयकर भरला. चळवळीपासून द्रोह केलेल्या नेहरूंनी लेडी माउंटबॅटन यांनी सांगितले म्हणून तीन दिवसात देशाची फाळणी काँग्रेसला न विचारता मान्य केली. या घाईघाईने केलेल्या फाळणीमुळे 20 लाख हिंदूंची हत्या झाली. हा देशद्रोह असून नाना पटोले आणि काँग्रेसने याचे उत्तर द्यावे असे आव्हान रणजित सावरकर यांनी दिले आहे. हिंदुत्ववादी विचारांचे प्रणेते सावरकर आहेत. त्यामुळे त्यांची बदनामी केल्यास हिंदुत्ववाद्यांचा पराभव करता येईल असे त्यांना वाटते. मात्र, त्यात त्यांना यश येणार नाही असा विश्वासही सावरकरांनी व्यक्त केला.

Leave a Reply