वर्धेत लम्पीने घेतले एका आठवड्यात २९ जनावरांचे बळी

वर्धा : ९ नोव्हेंबर – ‘लम्पी’ चर्मरोगाच्या साथीने जिल्ह्यात थैमान घातले असून गेल्या एका आठवड्यात तब्बल २७ जनावरांचा ‘लम्पी’मुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कनिष्ठ अधिकारी याचे खापर मुख्यालयी न राहणाऱ्या वरिष्ठांवर फोडत असून पशुपालक अधिकाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीने बेजार झाले आहेत.
‘लम्पी’ची साथ सर्व आठही तालुक्यात पसरली असली तरी आर्वी, आष्टी व कारंजा हे तीन तालुके सर्वाधिक प्रभावित आहेत. एकट्या आष्टी तालुक्यात ३८ जनावरे दगावली. प्रशासनातील बेपर्वा वृत्ती यास कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. वस्तुस्थितीची माहिती न दिल्याने जिल्ह्यातील सहा पशुवैद्यकीय अधिकारी बुलडाणा येथे पाठविण्यात आले. पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नागपुरातून ये-जा करीत असल्याने सर्व कारभार कनिष्ठांच्या हवाली आहे. आष्टीसाठी जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेले वाहन मुख्यालयाच्या सेवेत ठेवण्यात आले. तालुका अधिकारी वरिष्ठांचा दाखला देतात. पशुवैद्यकीय अधिकारी गंभीर नसल्याच्या पशुपालक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. लगतच्या अमरावती व नागपूर जिल्ह्यातून येथे प्रसार होत आहे. फारच गंभीर स्थिती तुलनेने नाही. अधिकारी कमी हे खरे असले तरी काळजी घेतल्या जात आहे. इतर आरोप व्यर्थ असल्याचे उपायुक्त डॉ. वासनिक यांनी म्हटले आहे.

Leave a Reply