आम्ही एक-एक कुळी बाहेर काढली, तर समस्या होईल – भाई जगताप यांचा बावनकुळेंना इशारा

मुंबई : ९ नोव्हेंबर – काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले होते. या यात्रेचा खर्च अडीच वर्षात महाविकास आघाडीने भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांमधून होतो आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला होता. दरम्यान, या आरोपाला आता काँग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बावनकुळेंनी फार जास्त काही बोलू नये. आम्ही एक-एक कुळी बाहेर काढली, तर समस्या होईल, असा इशाराच त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला आहे. .
“बावनकुळे असंच काही बोलू शकतात. त्यांच्याकडून दुसरं काही अपेक्षित नाही. या देशात नऊ वर्षांपासून भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. केंद्रीय मंत्रीमडळातील ४० टक्के मंत्र्यांवर खून, दरोड्यासारखे आरोप आहेत. मोदी सरकारने देशाला लूटले आहे. त्याला भ्रष्ट्राचार म्हणतात. त्यामुळे बावनकुळेंनी फार जास्त काही बोलू नये. आम्ही एक-एक कुळी बाहेर काढली, तर समस्या होईल. आपण आपल्या मर्यादेत राहायला हवं”, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी दिले आहे.
“महाराष्ट्रात ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रवेश झाला आहे. या यात्रेत मोठ्या नेत्यांनी त्यांच्या मुलांना समोर केले आहे. यासाठी खर्च होणारा पैसा नेमका कोणाच्या खात्यातून खर्च होतो आहे? केंद्रीय काँग्रेसच्या खात्यातून खर्च होतोय की महाराष्ट्र काँग्रेसच्या खात्यातून खर्च होतो आहे? हा पैसा जो खर्च होतो आहे, तो अडीच वर्षात महाविकास आघाडीने भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांमधून होतो आहे. सरकारमधून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सरकार हा काँग्रेसचा नेहमीचा अजेंडा आहे”, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.

Leave a Reply