ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अमरावतीत काँग्रेसचे धरणा व रास्ता रोको आंदोलन

अमरावती : ४ नोव्हेंबर – काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तिवसा येथे धरणे आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेची काहीवेळ तारांबळ उडाली होती. पेट्रोल पंप चौक ते तहसील कार्यालय असे २ किमी अंतर पायी चालत शेतकरी व पदाधिकारी यांनी तहसील कार्यालय गाठले आणि मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले.
तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर, कापूस, संत्री या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आधीच हवालदिल शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. जिल्ह्यातील पीक पैसेवारी सुद्धा जाहीर झाली असून तिवसा तालुक्याची पैसेवारी ४७ पैसे आली म्हणजेच दुष्काळी उपाययोजना शासन व प्रशासनाने कराव्या यासाठी तालुका पात्र आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. तिवसा तालुक्यातील वरखेड मंडळातील २५ गावांतील हजारो शेतकरी शासनाच्या बेजबाबदारपणामुळे ऐन दिवाळीत मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे वरखेड महसूल मंडळातील २५ गावांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी. विमा कंपनीकडून सुद्धा सर्वेक्षण सुरू आहे, पण पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना मदत देण्यास तयार नाही. महसूल व कृषी विभागाचे नुकसान सर्वेक्षण त्यांना मान्य नाही अशी माहिती उपलब्ध होत आहे याबाबत निराकारण करावे, पीकविमा नुकसानभरपाई लवकर देण्यात यावी यासाठी उदासीन असलेल्या कृषी खात्यामार्फत व पिकविमा मिळावा, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. आंदोलनात तालुका अध्यक्ष मुकुंदराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळबांडे, कार्याध्यक्ष सतीश पारधी, माजी सभापती चंद्रशेखर ठाकूर, नगरसेवक वैभव वानखडे, नगराध्यक्ष योगेश वानखडे, पंचायत समिती पदाधिकारी रोशनी पुनसे, कल्पना दिवे, अब्दुल सत्तार, अतुल गवड, अतुल खुळे, धीरज ठाकरे, सौ रुपाली काळे, किशोर दिवे, शरद वानखडे, नीलेश खुळे, रवी हांडे, रितेश पांडव, अतुल कळंबे आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply