मी फुल घेऊन येतो, वाटल्यास तुम्ही तलवार घेऊन या – बच्चू कडूंचे रवी राणांना उत्तर

मुंबई : 03 नोव्हेंबर – आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. आमदार रवी राणांच्या एका विधानामुळे आता हा वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत. ‘कुणी दम देऊन बोलत असेल, तर त्याला घरात घुसून मारण्याचीदेखील हिंमत आहे,’ असा इशारा राणा यांनी बच्चू कडू यांना दिला होता. यामुळे आता बच्चू कडू पुन्हा नाराज झाले आहेत. यावर आता बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, की मी रवी राणांचेही आभार मानले होते. मी फुल घेऊन येतो, वाटल्यास तुम्ही तलवार घेऊन या. माझ्या शरीराचा कुठला तुकडा पाहिजे ते सांगा. दोन-तीन दिवसानंतर मी माझ्या गावातच असणार आहे, असं सडेतोड उत्तर बच्चू कडू यांनी राणा यांना दिलं आहे.
यासोबतच त्यांनी या प्रकरणावरुन माध्यमांवरही निशाणा साधला. हा विषय आता मीडियाने थांबवला पाहिजे, अशी आग्रहाची विनंती असल्याचं कडू म्हणाले. मी सामान्य माणसांसाठी काम करणार असल्याचंही सभेत बोललो होतो, मात्र तुम्ही ते दाखवलं नाही. चांगल्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत आणि त्या समोर येत नाहीत, असं बच्चू कडू यावेळी बोलताना म्हणाले..
यावेळी बच्चू कडू यांना असा प्रश्न विचारण्यात आला की रवी राणा आणि तुम्ही, दोघे लोकप्रतिनिधी आहे, असं वाटत नाही का की तुमच्या वादात लोकांचे प्रश्न मागे पडत आहेत? यावर उत्तर देताना ते म्हणाले, की लोकांचे प्रश्न मार्गी लागतच आहेत ना. वीस हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे ती काय माझी एकट्याची जमीन आहे का? ती लोकांची जमीन आहे. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी काल माझ्या मतदारसंघातील प्रकल्पासाठी मंजुरी दिली, निधीही देणार आहे.. 20 हजार एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असंही ते म्हणाले.

Leave a Reply