ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील प्रमुख हिमनद्यांचे अस्तित्व धोक्यात – युनेस्को

नवी दिल्ली : 03 नोव्हेंबर – ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील काही प्रमुख हिमनद्यांचं अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती आहे. संयुक्त राष्ट्रांची सांस्कृतिक संस्था युनेस्कोच्या रिपोर्टनुसार, ‘ग्लोबल वॉर्मिंगमुळे बहुतांश हिमनद्यांचं अस्तित्व 2050 सालापर्यंत संपेल. यामध्ये इटलीतील डोलोमाइट्स, अमेरिकेतील योसेमाइट आणि यलोस्टोन पार्क, टांझानियामधील माउंट किलीमांजेरो यांचा समावेश आहे.’
युनेस्को सुमारे 18,600 हिमनद्यांचं निरीक्षण करते. युनेस्कोनं म्हटलं आहे की, ‘2050 पर्यंत त्यापैकी एक तृतीयांश नद्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल.’ रिपोर्टनुसार, जागतिक तापमान वाढ 1.5 डिग्री सेल्सियस (2.7 फॅरेनहाइट) च्या खाली ठेवल्यास उर्वरित हिमनद्या वाचवता येऊ शकतात. अन्यथा युनेस्कोच्या जागतिक वारसा हिमनद्यांपैकी सुमारे 50 टक्के हिमनद्या वर्ष 2100 पर्यंत जवळजवळ पूर्णपणे नामशेष होऊ शकतात.
युनेस्कोनं संरक्षित केलेल्या जागतिक वारसा हिमनद्या जगातील 10 टक्के हिमनद्यांच्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात. यामध्ये जगातील काही प्रसिद्ध हिमनद्यांचा समावेश आहे, ज्यांचे नुकसान सर्वांत जास्त होत आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, युनेस्कोनं तयार केलेल्या रिपोर्टचे प्रमुख लेखक टेल्स कार्व्हालो यांनी सांगितलं की, ‘जागतिक वारसा असणाऱ्या हिमनद्यांचा दरवर्षी सरासरी 58 अब्ज टन बर्फ वितळतो आहे. हे प्रमाण फ्रान्स आणि स्पेन या दोन्ही देशांना वर्षभरात जेवढं पाणी लागते, त्या पाण्याएवढं आहे.
जागतिक स्तरावर अभ्यास केल्यास लक्षात येतं की, या हिमनद्यांचा बर्फ वितळल्यामुळे निर्माण होणारं पाणी समुद्रपातळीच्या वाढीमध्ये सुमारे 5 टक्के योगदान देतं.’ दरम्यान, हे खूप चिंताजनक असून, ते रोखण्याची गरज आहे. याबाबत कार्व्हालो म्हणाले की, ‘जगभरातील प्रमुख हिमनद्या वितळण्यापासून रोखण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा संरक्षणात्मक उपाय म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करणं हा आहे.’
‘भविष्यात या हिमनद्या आणखी आकुंचित होऊ शकतात, व यामुळे आपत्तीचा धोका निर्माण होऊ शकतो,’ असेही युनेस्कोनं स्पष्ट केले त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी देखरेख आणि संशोधन सुधारून, तसचं आपत्ती जोखीम कमी करण्याच्या उपायांची अंमलबजावणी करून हिमनद्यांवर धोरणात्मकदृष्ट्या लक्ष केंद्रित केलं पाहिजं. याबाबत कार्व्हालो म्हणाले की, ‘हिमनद्या वितळल्यामुळे तलाव भरतात, पण ते तलाव फुटण्याचा धोका आहे. यामुळे विनाशकारी पूर येऊ शकतो.’
दरम्यान, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम जगभरात दिसून येत आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्यांचं अस्तित्व धोक्यात आलं असून यावर वेळीच नियंत्रण मिळवलं नाही, तर भविष्यकाळात मोठी संकटं निर्माण होऊ शकते.

Leave a Reply