आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू – देवेंद्र फडणवीस

मुंबई : १६ ऑक्टोबर – अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भूमिका घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीत या पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले. दरम्यान राज ठाकरेंच्या या पत्राबाबत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले असून आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू, असे ते म्हणाले.
भाजपामध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. राज ठाकरेंच्या पत्रावर मला निर्णय घ्यायचा असेल तर मला पक्षातील सहकाऱ्यांशी, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. तसेच बाळासाहेबांची शिवसेनादेखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशीही मला चर्चा करावी लागेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
“राज ठाकरे यांनी चांगल्या भावनेने हे पत्र लिहीले आहे. आम्ही त्यांच्या पत्राचा नक्कीच विचार करू. यापूर्वीही आर.आर. पाटील यांच्या वेळेसची निवडणूक असेल किंवा नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुका असतील, जेव्हा-जेव्हा आम्हाला अशाप्रकारे विनंती करण्यात आली, त्यावेळी आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुकीत आम्ही उमेदवार दिला असताना मला पक्षात चर्चा करावी लागेल. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेता येईल”, असेही ते म्हणाले.

Leave a Reply