नागपूर : १४ ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना मुस्लीम समुदयाशी चर्चा करावीशी वाटणे आणि त्यांच्या एका पदाधिकाऱ्याला देशातील गरिबी, बेरोजगारीची चिंता वाटणे हेच भारत जोडो यात्रेचे यश आहे, असा दावा ज्येष्ठ विचारवंत योगेंद्र यादव यांनी येथे पत्रकार परिषदेत केला
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना यादव म्हणाले, आम्ही काँग्रेस नेतृत्वाला किंवा पक्षाला पाठिंबा देण्यासाठी यात्रेत सहभागी झालो नाही. एखाद्या घराला आग लागलेली असेल आणि एका व्यक्तीच्या हातात पेट्रोलची आणि दुसऱ्या हातात पाण्याची बाटली असेल तर आपण आग विझवण्यासाठी पाण्याची बाटली असणाऱ्यांना सहकार्य करतो, हीच भूमिका आमची या यात्रेबाबत आहे. यात्रेची निंदा करण्याचा प्रयत्न भाजपच्या आयटी सेलने पाच-सहा वेळा केला. परंतु ते अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले. यात्रेद्वारे २०२४ मध्ये सत्ता बदल घडवून आणणे हे आमचे उद्दिष्ट नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने ईडी, सीबीआयचा गैरवापर केला. एवढेच नव्हेतर न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगावर प्रभाव टाकण्याचा सातत्याने प्रयत्न केला. कामगार कायदे बदलून कामगारांचे जीवन कष्टप्राय केले आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत वैचारिक मतभेद असून देखील देश हितासाठी आम्ही अंधरी (पूर्व) पोटनिवडणुकीत सेनेला पाठिंबा दिला, असे भाकपचे मिलिंद रानडे म्हणाले.