प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध – प्रा. नरेंद्र पाठक

नागपूर : १३ ऑक्टोबर – “ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते. “- प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असतानाच, त्यांच्या या वक्तव्याचा प्रा. नरेंद्र पाठक, कार्याध्यक्ष अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रांत यांनी जाहीर निषेध केला आहे.
आपल्यातील जात धर्म यांचे भेदाभेद मिटवून आपण एकत्र आले पाहिजे असा लोकांना उपदेश करणारे प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांनी स्वतःच्या भाषणात मात्र भेदभावाला खतपाणीच घातले आहे मराठीतील बहुतांश ललित लेखक हे ब्राह्मण होते, ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते आणि त्यांनी महात्मा गांधींना न्याय दिला नाही असे वर्णभेद निर्माण करणारे, भावना भडकावून दुही माजवणारे विखारी भाषण त्यांनी केले. दक्षिणायन महाराष्ट्र या संस्थेच्या नागपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या भाषणात खांडेकर ते प्र.के. अत्रे यांच्या पर्यंत अनेकांची निंदा करत त्यांनी न्यायालयांवरही टीका केली.
न्यायालये सुद्धा सध्या स्वच्छ राहिली नाहीत, हिंदू मताची झाली आहेत असे म्हणत अत्यंत अवमानकारक भाषण केले.
अशी भाषणे करून समाजातील भेदांना उत्तेजन देणाऱ्या विषारी प्रवृत्तीचा अखिल भारतीय साहित्य परिषद तीव्र निषेध करत आहे.
प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांचे नाव आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुचवले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. अशी द्वेषमुलक भाषणे करणाऱ्या आणि तशीच मते असणाऱ्या माणसांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले जाऊ नये असे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे स्पष्ट मत आहे.
साहित्याच्या उद्देश समाज तोडणे नसून समाज जोडणे आहे हे विसरून चालणार नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्षच जर भेदाला उत्तेजन देणारा असेल तर ते साहित्य संमेलन समाजाला कोणती दिशा दाखवणारे असेल?

Leave a Reply