नाल्याच्या पाण्याच्या वेढ्यात अडकलेली ३० मुले ग्रामस्थांनी सुखरूप काढली बाहेर

अकोला : १२ ऑक्टोबर – जिल्ह्यातील खिरपुरी परीसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे रिधोरा येथील नाल्याच्या पाण्याच्या वेढ्यात आज (११ ऑक्टोबर) तब्बल ३० मुले अडकली होती. या मुलांना सुखरुप बाहेर काढल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. अकोल्यातील रिधोरा येथील ही मुले भुलाबाई विसर्जित करण्यासाठी नाला ओलांडून शेतात गेले होते.
अकोल्यात काही दिवांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे रिधोरा गावामागील नाल्याला पूर आला. या नाल्यावरील छोट्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने रिधोरा येथील ३० चिमुकली मुले पाण्याच्या वेढ्यात अडकुन पडली होते. ही मुले सकाळच्या सुमारास भुलाबाईच्या बाहुल्या बुडवण्यासाठी गावाशेजारी असलेल्या शेततळ्यावर गेले होते. जाताना नाल्याला पाणी नव्हते. दरम्यान, खिरपुरी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे या नाल्याला पूर आला. ही मुले परत घराकडे निघाली असताना पुलावरून पाणी वाहत असल्याने ही मुले प्रचंड घाबरली.
ही मुले नाल्याला आलेल्या पुरामुळे अडकल्याची माहीती गावात वाऱ्यासारखी पसरली. तलाठी प्रशांत बुले, पोलीस पाटील सुजय देशमुख, सरपंच संजय अघडते, प्रमोद चौधरी, मदत पथकाचे नितीन देशमुख यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला अन् अडकलेल्या मुलांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी उपाययोजना सुरु केली. यामुळे मुलांची सुखरूप सुटका झाली. या सर्व मुलांना दोरी बांधून बाहेर काढण्यात आले आहे.
अकोल्यातील शिवाजी कृषी महाविद्याल हवामान केंद्राने मंगळवारी पावसाचा अंदाज जाहीर केला. यानुसार पुढले काही दिवस विदर्भात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती येथे शुक्रवारपर्यंत जोरदार पासवसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अकोला येथे ११ ते १४ ऑक्टोबरदरम्यान हलका ते मध्यम, वाशिम, चंद्रपूर व बुलढाणा येथे मध्यम पाऊस, याशिवाय यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे हलका ते मध्यम पाऊस आहे.

Leave a Reply