मुख्यमंत्र्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला का? – अंबादास दानवे

यवतमाळ : १९ सप्टेंबर – गेल्या तीन महिन्यातही आत्महत्यांचे सत्र हे सुरुच आहे. सर्वाधिक आत्महत्या ह्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या असून मुख्यमंत्र्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडला आहे का? अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज यवतमाळ येथे केली. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला त्रासून शेतकरी आत्महत्या करीत आहे. मात्र, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील जनतेला काय आश्वासन दिले होते, याची आठवण आता विरोधक करुन देत आहेत. हे राज्य कष्टकरी, शेतकरी आणि मजूरांचे असून भविष्यात महाराष्ट्र हा आत्महत्यामुक्त होण्यासाठी यंत्रणा राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या भागात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते, पीक पाहणी करुन ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेटणार होते. शेतकरी कुटुंबियांची स्थिती पाहून त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण झाली.
शेतकरी हिताच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली. पोखरा सारख्या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होत असून हे सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचणेही गरजचे आहे.
रामदास कदम यांचे राजकीय जीवन हे शिवसेनेमुळेच घडले आहेत. पण आता त्यांना त्या गोष्टींचा विसर पडला आहे. सर्वकाही शिवसेनेमुळेच मिळाल्याचे त्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. पण सध्या ते उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत आहेत ते अशोभनीय असल्याचेही दानवेंनी सांगितले.
ते 40 गद्दार म्हणजेच शिवसेना नाही. हा पक्ष मर्दांचा असून आजही सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. त्या आमदारांनी दिलेला धोका महाराष्ट्रातील जनता कधीही विसरु शकणार नाही. तर शिवसेना हा जात, पात न मानणारा पक्ष असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply