ग्रामपंचायत निवडणुकीत राणा दाम्पत्याला धक्का

अमरावती : १९ सप्टेंबर – अमरावती जिल्ह्यात खासदार रवी राणा आणि आमदार रवी राणा हे या ना त्या मुद्यामुळे कायम चर्चेत असतात. पण, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने राणा दाम्पत्याला चांगलाच धक्का दिला आहे. 5 पैकी 3 सरपंचपदं काँग्रेसने पटकावली आहे. तर भाजपच्या वाटेला एकच जागा आली आहे.
अमरावती जिल्ह्यात रविवारी 5 ग्रामपंचायतमध्ये मतदान पार पडल्यानंतर आज तासाभरात मतमोजणी पार पडली. यात तिवसा तालुक्यात माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उंबरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे नितीन कळंबे, घोटा ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या रुपाली राऊत आणि कवाडगव्हाण ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी काँग्रेसच्या मोहिनी चौधरी या विजयी झाल्या आहेत. तिवसामध्ये तिन्ही ग्रामपंचायतीवर यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेसने बाजी मारली आहे.
तर चांदुर रेल्वे तालुक्यातील चांदुरवाडी ग्रामपंचायत मध्ये भाजप आमदार प्रताप अडसळ यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदी भाजपच्या वर्षा माताडे विजयी झाल्या आहेत. तसंच धारणी तालुक्यातील हरिसाल ग्रामपंचायतीमध्ये आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे रामेश्वर दारशिंबे विजयी झाले आहेत. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर प्रथमच सरपंच पदाची निवडणूक जनतेतून झाली आहे. यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिंदे गटाला एकही जागा जिंकता आली नाही.
राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. 608 ग्रामपंचायतींपैकी 51 जागा बिनविरोध झाल्या आहेत. आतापर्यंत 112 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. नंदुरबारमध्ये 40 ग्रामपंचायत निवडणूक निकालाचा कल हाती आला आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहे. भाजपने सर्वाधिक 18 जागा जिंकल्या आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही 14 जागा जिंकल्या आहे. तर काँग्रेसने 4 जागांवर बाजी मारली आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खातंही उघडता आलं नाही.

Leave a Reply