आता तरी शिवसेनेने डोळे उघडावे – आशिष शेलार

मुंबई : १९ सप्टेंबर – राज्यात महाविकास आघाडी मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला संपवले असून; शिवसेना पक्ष आता चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आता तरी शिवसेनेने डोळे उघडावे आणि एकनाथ शिंदे यांचे बंड किती योग्य होते हे स्पष्ट झाले, अशी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दरम्यान केली.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. या निकालांमध्ये भाजपा पहिल्या क्रमांकावर तर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर दिसून येत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. तर लोकांकडून शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती मिळत आहे, त्यामुळे शिंदे यांचे बंड योग्यच होते, असा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसने संपवले असून; ही गोष्ट सत्य असल्याचे आताच्या आकड्यांवरून समोर आले आहे. एकनाथ शिंदे जे वारंवार सांगत होते, त्यात तथ्य असल्याचे समोर आले आहे. आता तरी शिवसेनेचे डोळे उघडतील असेही शेलार यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात जनतेने भाजपला भरभरून प्रतिसाद दिला; याबद्दल राज्यातील जनतेचे आपण आभारी आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी आपण मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी शंभर कोटी रुपयांचा निधी पळवल्याचा गंभीर आरोप केला आहे. रामदास कदम यांचा हा आरोप अतिशय गंभीर असून त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने केलेल्या आरोपाची गंभीर दखल घेण्यात यावी. त्यांना आदित्य ठाकरे यांच्या बाबत नक्कीच अधिक माहिती असणार, त्यामुळे याबाबत आदित्य ठाकरे यांनी स्वतःहून चौकशीला सामोरे जावे असे आव्हानही शेलार यांनी केले आहे.

Leave a Reply