अखेरच्या प्रवासातही नरकयातना, अंत्यसंस्कारासाठी मृतदेह नेत असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी

औरंगाबाद : १४ सप्टेंबर – एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचपार्श्वभूमीवर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला गेला. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरीही देशातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाला नसल्याची प्रचिती येत असते.
याबाबतची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह ट्रॅक्टरमध्ये नेत असताना खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या घटनेमुळे अखेरच्या प्रवासातही नरकयातना सोसाव्या लागल्याचे दिसत आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील ही घटना आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद जवळील मत्तेवाडी येथील नागरिकांना आयुष्याच्या अखेरचा प्रवासही खडतर करावा लागत आहे. मत्तेवाडीवर जाण्यासाठी असणारा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असल्याने हा त्रास सहन करावा लागत आहे. मत्तेवाडी येथील ज्ञानेश्वर देवराव मत्ते यांचे आज पहाटे चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गल्ले बोरगावपर्यंत त्यांना रुग्णवाहिकेत आणण्यात आले. मात्र, राहत्या घरी मत्तेवाडीचा रस्ता पूर्ण चिखलमय झाल्यामुळे त्यांचा मृतदेह ट्रॅक्टरमध्ये नेत होते. खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. यात सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. यानंतर मृतदेह बैलगाडीत नेण्यात आला. रस्ता खराब असल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नातेवाईकांची देखील मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली.

Leave a Reply