ही कोणती मताची लाचारी होती? – याकूब मेमनच्या कबरीवरून सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना सवाल

चंद्रपूर : ८ सप्टेंबर – मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं कोविड काळात सुशोभीकरण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या आहेत. तर भाजपा नेत्यांकडून या मुद्य्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“या प्रकरणावरून टीका तर होणारचं, कारण जे दहशतवादी विचारांचे आहेत. या देशात दहशतवाद निर्माण करण्याच्या दृष्टीने जे लोक काम करतात ते या देशाचे शत्रू आहेत. ते एका जातीचे, धर्माचे, समुहाचे, वयाचे शत्रू नाहीत, तर या देशाचे, भारतमातेचे शत्रू आहेत आणि भारतमातेच्या शत्रूचं जर तुम्ही स्मारक कराल. ज्यामध्ये न्यायमूर्तींनी या दहशतवादी विचाराला कायद्याच्या चौकटीत संपवण्याचा आदेश दिला, की हा विचार देशासाठी धोकादायक आहे. त्या विचाराचं उदात्तीकरण तुम्ही कसं करू शकता?” अशा शब्दांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली.
याशिवाय, “माझ्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने प्रगतीसोबतच या गोष्टीकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो. कारण, एक सेकंदही न लावता त्यांनी सांगितले की, मी समिती निर्गमीत करतो आणि समितीची घोषणा करतो व गंभीरपणे चौकशी करतो. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करतो. यामध्ये गुप्तचर विभागाची माहिती का मिळाली नाही?, मिळाली होती तर मग रोज सकाळी जेव्हा मुख्यमंत्र्यांना पोलीस विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी हे सर्व ठिकाणीची महत्त्वाची माहिती देत असतात, मग या घटना मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगण्यात आल्या होत्या का? सांगितल्या नसतील तर का सांगितल्या गेल्या नाहीत? आणि जर सांगितल्या तर मग त्यांनी यावर कारवाई का केली नाही? ही कोणती मताची लाचारी होती? इथं मुख्यमंत्र्यांना बाहेरून कोणाचा आदेश होता का, की तुम्ही याकडे दुर्लक्ष करा. हे सर्व जनतेसमोर आलं पाहिजे.” असे प्रश्न देखील मुनगंटीवार यांनी यावेळी उपस्थित केले.

Leave a Reply