ज्याची शिवसेना त्याचा दसरा मेळावा, सुप्रीम कोर्टात निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच लागणार – बच्चू कडू

पुणे : ७ सप्टेंबर – सुप्रीम कोर्टात निकाल शिंदे गटाच्या बाजूनेच लागणार, असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आज सुनावणी होणार होती. मात्र ती 27 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या वादावर बच्चू कडू यांनी शिंदे गटाची बाजू लावून धरली. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी शिंदे गटाकडून केली जात आहे. यावर धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर अधिक संभ्रम निर्माण होईल, असे ते म्हणाले. दसरा मेळाव्यावरही त्यांनी मत व्यक्त केले आहे. ज्याची शिवसेना त्याचा दसरा मेळावा, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे साहेबांची सेना आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
अमरावतीचे प्रकरण मला माहीत नाही. तुम्ही आता सांगत आहात. लव्ह जिहाद आहे का लव्ह आहे, असे विचारत एकूणच या प्रकरणाची माहिती घेतो, असे बच्चू कडू म्हणाले. अमरावतीत लव्ह जिहाद झाल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पोलिसांना प्रश्नही विचारले. अमरावतीतील एक 19 वर्षीय तरुणी कालपासून गायब आहे. तिला एक मुलगा घेऊन गेल्याचे बोलले जात आहे. पण ज्या मुलावर याबाबतचा संशय आहे, तो त्याच्या घरीच आहे. त्यामुळे या तरुणीचे नेमके काय झाले, सध्या ती कुठे आहे? असे प्रश्न नवनीत राणा यांनी केले आहेत. या प्रकरणाबाबत माहिती घेत असल्याचे कडू म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा लोकांची कामे महत्त्वाची आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लांबला तरी चालेल, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. काही मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मात्र अनेक मंत्री अद्याप प्रतीक्षेत आहेत, नाराज आहेत. बच्चू कडूही त्यापैकीच एक. मात्र आपण नाराज नसून जनतेची कामे करत असल्याचे कडू म्हणाले.

Leave a Reply