महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य – चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : ६ सप्टेंबर – गेल्या दोन महिन्यात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सराकर स्थापन झालं आहे. मात्र, हे सरकार आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या बारामती दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी भाजपा पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने संघटनात्मक उभारणीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगितलं.
यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपाचं २०२४च्या विधानसभा निवडणुकांमध्ये ४५हून जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य असेल, असा निर्धार व्यक्त केला. “महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभा जागा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा आमच्या युतीच्या बळावर आम्ही निवडून आणू. जनता ही विश्वासघात करणाऱ्यांना बाजूला करेल आणि जे खरे हिंदुत्वाचं रक्षण करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना जनता मदत करेल ही आम्हाला अपेक्षा आहे”, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.
“येत्या दोन महिन्यात मी सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. आमच्या संघटनेच्या माध्यातून पुढच्या काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेना आणि भाजपा युतीच्या माध्यमातून ४५हून जास्त जागा जिंकून आणू”, असंही बावनकुळेंनी नमूद केलं.

Leave a Reply