नवनीत राणा जरा तोंड सांभाळून – शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांची घणाघाती टीका

मुंबई : ६ सप्टेंबर – नवनीत राणा जरा तोंड सांभाळून… कोण आहात आपण? सी ग्रेड फिल्ममध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री… एक आमदार आपल्यावर भाळला आणि राजकारणात आपला चंचूप्रवेश झाला, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य करून स्वतःला किरकोळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनीत राणांचा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंना एकरी भाषेत बोलत नवनीत राणा यांनी पातळी सोडून ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. संजना घाडी यांनी राणांवर टीका केली आहे. शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्या शूर्पणखा असा उल्लेख त्यांनी राणांचा केला आहे.
काय संबंध आपला हनुमान चालीसाशी? हनुमानाला हनुमान का म्हणतात? याचे साधे उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आले नाही आणि म्हणे मी हनुमान भक्त, असे घाडी म्हणाल्या. भाजपाच्या सी, डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितले. तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात. ज्या बाईला लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेले मातोश्री, मंदिर आणि मशिदीतील फरक कळत नाही, त्या बाईला आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती, असा हल्लाबोल केला आहे.
‘तुम्ही म्हणाल शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली म्हणून मातोश्री आणि मातोश्रीचे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत, बाळासाहेबांचे राहिले नाहीत. पण याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लीम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची परवानगी दिली होती. त्यांनीदेखील बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केली होती. तुमच्यासारख्या मुंबईची मुलगी म्हणून घेणाऱ्या बाईला हे माहीत पाहिजे होते. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी सी ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवत आहे, हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे.
घाडी पुढे म्हणाल्या, की कावळीणीच्या शापाने गाय मरत नसते बाई. त्यामुळे माझ्या शापामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायामुळे शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही, अशा फाजील वल्गना करून असली थेरं महाराष्ट्राला दाखवू नका. शिवसेना ही कालही मजबूत होती, आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई, महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे. कितीही शूर्पणखा अंगावर आल्या तरी त्यांचे नाक कापून पुढे येणार, असे संजना घाडी म्हणाल्या.

Leave a Reply