काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर, भाजपच दक्षिणेकडील राज्यांचं भविष्य – अमित शाह

नवी दिल्ली : ४ सप्टेंबर – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी केरळ दौऱ्यात काँग्रेस पक्षाबाबत मोठं विधान केलं आहे. बैठकीत संबोधित करताना अमित शाह यांनी भाजपाच राज्याचं भविष्य असल्याचं म्हटलं आहे. अमित शाह म्हणाले “भाजपा पक्षच दक्षिणेकडील राज्यांचं भविष्य आहे आणि आता जग कम्युनिस्ट पक्षांपासून मुक्त होत आहे”.
अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवर हल्ला करताना पक्ष आता देशातून लुप्त होत असल्याचा टोला लगावला. “काँग्रेस भारतातून आणि कम्युनिस्ट पक्ष जगातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे,” असं अमित शाह म्हणाले आहेत. थिरुअनंतपुरम येथे हा कार्यक्रम पार पडला.
अमित शाह यांनी यावेळी केंद्र सरकारने मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत केलं. ते म्हणाले “काँग्रेस पक्ष आणि कम्युनिस्ट यांनी कधीही अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी काम केलं नाही. फक्त व्होट बँक म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात आलं”.
काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाकडेही दुर्लक्ष केलं, कारण त्यांच्या राजवटीत त्यांना भारतरत्न देण्यात आला नाही असंही अमित शाह यांनी सांगितलं. “काँग्रेसला बाहेर काढल्यानंतरच त्यांना भारतरत्न देण्यात आला,” असं ते म्हणाले.
अमित शाह यांनी यावेळी राज्यात कार्यकर्त्यांकडून केलं जात असल्याच्या कामाचं कौतुक केलं. ते म्हणाले “केरळमध्ये देशासाठी काम करत असताना राष्ट्रभक्ती, बलिदान आणि शौर्य यांची गरज आहे”.

Leave a Reply