अमरावती : १ सप्टेंबर – अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील बिरोटी गावात युवक व महिलेमध्ये शेतीच्या धुरावर बैल चारण्याच्या कारणावरून वाद झाला. महिलेसोबत युवकाची झटापट झाली. यात शेतीच्या वादातून आरोपीने धुर्यावर महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर दगडाने ठेचून महिलेची हत्या केली. ही महिला 40 वर्षे वयाची आहे. महिलेचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत शेती बांधावर पडून होता. या प्रकरणी धारणी पोलिसांनी सचिन उर्फ रम्मू दारसींभे वय 26 वर्ष याला अटक केली. तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.
धारणी तालुक्यातील बिरोटी येथे एका महिलेचं मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी शेतावर गेले. पोलिसांनी चौकशी केली असता हा प्रकार बलात्कार आणि खून असा असल्याचं स्पष्ट झालं. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. सचिन दारसींभे या आरोपीने खून केल्याची कबुली दिली. आता आरोपीकडून सविस्तर माहिती घेणे सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
शेतातले वाद हा काही नवीन विषय नाही. पावसाळ्यात छोट्या-छोट्या कारणासाठी असे वाद होत असतात. बिरोटीतही असाच वाद झाला. माझ्या शेतात बैल चारू नको. मला गवत लागतं, यावरून हा वाद झाला. युवक व महिला यांची बाचाबाची झाली. असे वाद यापूर्वी झाल्याची माहिती आहे. कालही असाच वाद झाला. या वादात 26 सचिननं 40 वर्षीय महिलेवर अत्याचार केला. तेवढ्यावरच तो थांबला नाही. तर त्यानं नंतर दगडानं ठेचून महिलाचा खून केला. त्यानंतर तिला निर्वस्त्र अवस्थेत तसेच सोडून दिले. गावात पळून गेला. महिलेचा मृतदेह दिसताच गावकऱ्यांनी माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर संशयावरून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीनं खून केल्याची कबुली दिली.
०००००००००
अमरावतीत शहर हद्दीत बिबट्याचे बछडे आढळल्याने उडाली खळबळ
अमरावती : १ सप्टेंबर – शहरातील महादेव खोरी नजीकच्या जंगलात गुरुवारी दुपारी बिबट्याचे दोन बछडे नागरिकांना आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. या बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले असून त्यांना वडाळी येथील वन उद्यानात ठेवण्यात आले आहे.महादेव खोरी परिसर यापूर्वीही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. येथूनच जवळ वनविभागाने वनीकरण केले आहे.
पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग मानला जातो. गुरुवारी सकाळी काही जणांना या परिसरात बिबट्याचे दोन बछडे दिसून आले. त्यांनी लगेच फ्रेझरपुरा पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची सूचना वनविभागाला दिली. लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट मादी पळून गेली. वनविभागाच्या पथकाने या बछड्यांना सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यांना वडाळी येथील उद्यानात हलवण्यात आले आहे. या बछड्यांना त्यांच्या जन्मदात्रीकडे परत सोडण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे वनविभागातील सूत्रांनी सांगितले.
बिबट्याचे दोन बछडे पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीला आवर घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर पोलिसांच्या सहकार्याने वनविभागाच्या पथकाने या बछड्यांना तेथून सुरक्षितरित्या बाहेर काढले. या बिबट्याचे वय सहा ते सात महिने इतके आहे.
बछड्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळावा, यासाठी त्यांना पुन्हा जंगलात आईकडे सोडण्याचे प्रयत्न करायला हवेत. या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून बिबट मादीचा शोध घेतला जावा, अशी अपेक्षा राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी व्यक्त केली आहे. महादेव खोरी परिसरातील एका ‘फार्म हाऊस’वर गेल्यावर्षी बिबट्या आढळून आला होता. कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न त्याने केला होता.