ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे ह्यांच्या प्रतिभेचा अप्रतिम, अफलातून किस्सा…
१९७६ साली कराडला साहित्य संमेलन झाले, त्याचे मावळते अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे आणि उगवत्या अध्यक्षा होत्या दुर्गा भागवत. संध्याकाळी एक कवी संमेलन होतं आणि सूत्रसंचालक होते पु. ल. आणि त्यामुळेच त्या कवी संमेलनात एक खेळीमेळीचं वातावरण होतं.
त्यावेळी साहिर लुधियानवी (हिंदी चित्रपट सृष्टीतले एक मोठे कवी) मंचावर आले. ते म्हणाले,”अभी मैं जो हिंदी कविता सुनाने जा रहा हूँ उसका कोई मराठी तर्जुमा जरा बताएँ।”
पु.ल. नी समोरच बसलेल्या माडगूळकरांना वर बोलवलं. आणि म्हणाले, “साहिरजींनी आत्ता काय सांगितलं ते तर तुम्ही ऐकलंच, पण ह्या मराठी रुपांतरात माझी एक अट आहे. ह्या रुपांतरात एक असा मराठी शब्द हवा, ज्याला भारतातल्या कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही”. असा विश्वास होता पुलंचा मित्रावर.
मग साहिरजींनी तो शेर ऐकवला –
“एक बात कहूँ राजा किसीसे ना कहिओ जी, एक बात कहु राजा किसीसे ना कहिओ जी,
रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।
सेजिओ पे दिया जलाना हराम है,
खुशियों में, जलनेवालों का क्या काम है?
अँधेरे में रह के जड़ाओ, मजा पियो जी,
रातभर रहिओ, सबेरे चले जइयो जी।”
आणि साहिरजींचा शेवटचा “जी” पूर्ण होईपर्यंत माडगूळकरांचं पूर्ण मराठी रुपांतर झालं होतं.
“एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी,
एक अर्ज सुना दिलवरा, मनीच मनी ठेवा जी…
ओ रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी…
सेजेशी समई मी लावू कशाला?
जुळत्या जीवालागी जळती कशाला?
अंधाऱ्या राती इश्काची मजा घ्यावी जी,
रातभर तुम्ही राव्हा, झुंझुरता तुम्ही जावा जी”…
ह्यातील ‘झुंझुरता’ ह्या शब्दाला इतर कोणत्याही भाषेत प्रतिशब्द नाही… ह्याला म्हणतात प्रतिभा…. आणि हा किस्सा इथेच संपत नाही. ह्याच्याही वरची कडी म्हणजे पु.ल. नी त्याचवेळी तिथे पेटी मागवली, तिथल्या तिथे ह्या कवितेला चाल लावली आणि तिथल्यातिथे ती गाऊन दाखवली.
असे हे आपले मराठी प्रतिभावंत…
एक नंबरी सोनेरी नाणं…. धन्य धन्य ती माय मराठी।।
लेखक अज्ञात…
समाजमाध्यमावरून साभार..