महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर २९ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता

नवी दिल्ली : २५ ऑगस्ट – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी येत्या 29 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणीची तारीख मागील वेळी कोर्टाने दिली होती. मात्र दुपारपर्यंत ही याचिका कोर्टाच्या पटलावर लीस्टच करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचिका पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे. 23 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर शिवसेना विरोधा एकनाथ शिंदे हा खटला घटनापीठासमोर मांडण्यात येईल, असे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर आज या प्रकरणी कोर्ट काय निर्देश देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र आज दुपारपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या पटलावर ही याचिका लीस्ट झालेली नाही. त्यामुळे या खटल्याची सुनावणी आता सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा हे उद्या निवृत्त होत आहेत. त्यांच्यासमोरच आज शिवसेनेची याचिका पटलावर येईल असे म्हटले जात होते. मात्र या प्रकरणी आज काही सुनावणी होईल, याची शक्यता मावळली आहे. उद्यापासून उदय ललित हे नवे सरन्यायाधीश पदभार हाती घेतील. त्यानंतर सोमवारी त्यांच्यासमोरच या खटल्यावरील पुढील सुनावणी होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान आज शिवसेना नेते अनिल देसाई, सुभाष देसाई हे सुप्रीम कोर्टात पोहोचले होते. या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेतली जावी, अशी शिवसेनेची आधीपासूनची मागणी आहे. यापूर्वीही शिवसेनेनं या विषयावरून याचिका मेंशन केली होती. आज पाच जणांचं घटनापीठ तयार होईल आणि त्यासमोर ही सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र घटनापीठाची निर्मिती अजून झाली नसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही सुनावणी सोमवारी होईल, असे म्हटले जात आहे.

Leave a Reply