भारत विकास परिषदेचे एक दिवसीय संमेलन 29 सप्‍टेंबर रोजी, राज्यपाल, सरसंघचालक यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर : २३ ऑगस्ट – भारत विकास परिषदेचे एक दिवसीय संमेलन येत्‍या 29 सप्‍टेंबर रोजी रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्‍यात येणार असून संमेलनाच्‍या उद्घाटनाला राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी व समारोपाला राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्‍थ‍िती राहणार आहे. भारत विकास परिषदेच्‍या विदर्भ प्रांतांची बैठक सोमवारी गोकुळपेठ येथील संपर्क कार्यालयात पार पडली.
श्‍याम शर्मा म्‍हणाले, भारत विकास परिषद ही समाजातील समंजस व प्रबुद्ध लेाकांचे संघटन असून समाजात सेवा व संस्‍कार रुजवण्‍याचे कार्य करते. विदर्भ प्रांत भारत विकास परिषदेचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढावे या उद्देशाने एक दिवसीय संमेलन सप्‍टेंबर महिन्‍यात घेण्‍यात येणार आहे. या संमेलनात भारत विकास परिषदेची वर्तमान स्थिती व भविष्‍यातीला कार्यपद्धतीवर विचारविमर्श केला जाणार आहे. याशिवाय, भारत निर्माणात प्रबुद्ध लोकांची भूमिका यावर परिचर्चा देखील आयोजित करण्‍यात येणार आहे, असेही ते म्‍हणाले.
सुधीर पाठक म्‍हणाले, संमेलनाच्‍या व्‍यवस्‍थेसाठी विविध समित्‍या तयार करण्‍यात आल्‍या असून संमेलनाला एक हजारहून अधिक लोकांची उपस्‍थ‍िती अपेक्षित आहे. संमेलनासाठी नियोजन करण्‍यासाठी विमल भास्‍कर, 47 अ, गोकुळपेठ, हिल रोड, नागपूर येथे संपर्क कार्यालय सुरू करण्‍यात आले असून सायंकाळी 6 ते 8 वाजेदरम्‍यान येथे कामकाज चालेल. बैठकीला भारत विकास परिषदेचे राष्‍ट्रीय महामंत्री श्‍याम शर्मा यांच्‍यासह क्षेत्रीय अध्‍यक्ष सुधीर पाठक, विदर्भ प्रांत अध्‍यक्ष चंद्रशेखर घुशे, महासचिव पद्माकर धानोरकर, वित्‍त सचिव संजय गुळकरी, संपर्क प्रमुख सारिका पेंडसे, महिला व बाल विकास विभाग सचिव निलिमा बावणे इत्‍यादी प्रांत पदाधिकारी उपस्‍थ‍ित होते.

Leave a Reply