दोन्ही पक्षांना वाटतंय आमच्याच बाजूने निकाल लागेल, आपण वेट अँड वॉचवर – छगन भुजबळ

नाशिक : २१ ऑगस्ट – राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या फैसला होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? आणि अपात्र आमदारांचं काय होणार? याचा उद्या फैसला होणार आहे. तसेच राज्यातील शिंदे सरकारचंही या निमित्ताने उद्याच भवितव्य ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. आमच्याच बाजूने निकाल लागेल असं दोन्ही पक्षांना असं वाटतंय. आपण वेट अँड वॉचवर आहोत. उद्या निर्णय लागतो की आणखी काही घटनात्मक बेंच बसते हे पाहावं लागणार आहे. मागेच वाटले होते की निर्णय लागेल पण तारीख पुढे गेली. घटनापीठ तयार करावे लागेल असे सुद्धा कोर्टाने म्हटले होते, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देणार आहेत.
छगन भुजबळ यांनी यावेळी आशिष शेलार यांच्या आरोपांचाही समाचार घेतला. कोरोना असल्याने सगळेच, तुम्ही सुद्धा घरी बसले होते. मोदी साहेबांनीच लॉकडाऊन सांगितल्याने आपण धार्मिक सण कसे साजरे करणार होतो? कोरोना कमी झाल्याने आता धार्मिक स्थळांवर, सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होते आहे. गणेशोत्सव, नवरात्रात सुद्धा गर्दी होणार असल्याने हे श्रेय भाजपने घेता कामा नये. दोन वर्षांचीच आता भरपाई होते आहे, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
यावेळी त्यांनी एमआयएमचे नेते ओवैसी यांनाही सबुरीचा सल्ला दिला. ओवैसी यांनी द्वेष निर्माण करू नये. टिपू सुलतान लढले तो इतिहास आहेच. पण सावरकरांनी सुद्धा काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा भोगली त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही, असं त्यांनी सांगितलं.
मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल असं काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही त्यांनी कोटी केली. सर्वच पक्ष म्हणताय आमचा महापौर बसणार. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी असे म्हणावे लागते, असा चिमटा त्यांनी फडणवीसांना काढला
यावेळी त्यांनी शिवभोजन योजनेवरही भाष्य केलं. शिवभोजन केंद्रांचे पैसे अडकले आहेत याबाबत उद्या मी हाऊसमध्ये बोलेल. सरकारला सांगेल की ही गरीब मंडळी असून त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ते केंद्र बंद पडतील. चांगली योजना असून सरकारने ती सुरू ठेवावी. सत्तांतर झाले पण मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. पालकामंत्री नाहीये आणि आता अधिवेशन सुरू झाले त्यामुळे कोणाकडे याबाबत बोलायचे हेच कळत नाहीये, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Leave a Reply