नागपूर : २१ ऑगस्ट – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवायची आहे, असं वक्तव्य भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्या वक्तव्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. बाळासाहेबांच्या नावाने आता मताचा जोगवा मागितला जात आहे म्हणजे मोदीपर्व संपले असल्याची कबुलीच म्हणावे लागले, अशा शब्दांत ठाकरे यांनी फडणवीसांवर साधला आहे. त्यावर आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यत्तर दिलं आहे.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, बाळासाहेबांनी मुंबईसाठी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न त्यांच्याच लोकांनी चुरचूर करत पायदळी तुडवले आहे. ते फक्त भ्रष्टाचारामध्ये गुंतून राहिले आणि स्वप्न पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे मुंबईसाठीचे ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. जर त्यांनी माझे भाषण नीट ऐकले असते, तर अशी प्रतिक्रिया दिली नसतीच, असे फडणवीसांनी सांगितलं.
‘त्यांच्या नेत्यांपेक्षा पंतप्रधानांचे…’ – मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिले. त्यांच्या नेत्यांपेक्षा पंतप्रधान मोदींचे मोठे मोठे फोटो लावून तुम्ही निवडून आला आहात, कशाला हे विसरता. जे काय उद्धव ठाकरे म्हणाले असतील आता जनताच त्याचा उत्तर देईल. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचा म्हणाले त्यांचे स्वागत आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.