अशाने देशाची प्रगती कशी होईल? – अरविंद केजरीवाल यांचा मोदी सरकारला सवाल

नवी दिल्ली : २१ ऑगस्ट – केंद्रीय अन्वेशन विभागाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह १३ जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी रोज सकाळी उठून सीबीआय-ईडीचा खेळ सुरू केला तर देशाची प्रगती कशी होणार? असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ”ज्यावेळी सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. करोडो तरुण बेरोजगार आहेत. अशा वेळी केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांशी बेरोजगारी आणि महागाईशी लढायला हवे, त्या ऐवजी ते संपूर्ण देशाशी लढत आहेत. रोज सकाळी उठून सीबीआय-ईडीचा खेळ सुरू करतात.” अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. तसेच अशाने देशाची प्रगती कशी होईल? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
केंद्रीय अन्वेशन विभागाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह १३ जणांविरोधात लूक आऊट नोटीस जारी केली आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील भ्रष्टाचार झाल्याचा आरोपी सीबीआयने केली आहे. मनीष सिसोदिया आणि इतर अधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ नुसार काही निर्णय घेतले. हे निर्णय घेताना संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. टेंडर काढताना काही जणांना फायदा होईल, असे निर्णय घेतल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये नमुद केले आहे. सिसोदिया यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना काही कोटींचे पेमेंट ‘इन्डोस्पिरीट’चे मालक समीर महेंद्रू यांनी केल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे. महेंद्रू हे मद्य व्यापारांपैकी एक असून उत्पादन शुल्क धोरण आखण्यात आणि राबवण्यात गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणात सीबीआयने काही आरोपींना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. यातील काही आरोपी मनीष सिसोदियांच्या जवळचे सहकारी आहेत.

Leave a Reply