फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू होती हैं – आशिष शेलार

मुंबई : २० ऑगस्ट – मुंबईमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. “फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू”, असे म्हणत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर यांच्यासह इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमात टोल, रस्ते, खड्डे आणि विकास कामांवरुन शेलारांनी शिवसेनेवर टीका केली. मुंबई अध्यक्षपदावरुन झालेल्या टीकेला देखील शेलारांनी या कार्यक्रमात उत्तर दिलं. मुंबईतील समस्यांची जाण असल्यानेच अध्यक्षपदी निवड झाल्याचे शेलार यावेळी म्हणाले.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४५ हजार कोटींचा आहे. देशातील अनेक राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. महापालिका एवढी श्रीमंत असताना मुंबईकरांसाठी शिवसेनेनं काय केलं? त्यांना कोणत्या सुविधा दिल्या? असा सवाल आशिष शेलारांनी केला. शिवसेनेनं मुंबईला केवळ भ्रष्टाचार दिला, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
“मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीसांनी दिली, राज्याच्या राजधानीत ५२ पूल नितीन गडकरींनी बांधले, कोस्टल रोडची मुहुर्तमेढ देवेंद्र फडणवीसांनी रोवली, मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने निधी दिला”, असे सांगत मुंबईच्या विकासामध्ये भाजपा नेत्यांचे योगदान शेलारांनी यावेळी सांगितले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लालबागचा राजा विराजमान झाला नाही, असेही शेलार यांनी या कार्यक्रमात म्हटले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबईची सत्ता भाजपाला मिळेल, असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply